सोलापूर : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका व्यासपीठावर येऊन पुत्र आदित्य ठाकरे यांच्या डोक्यावर हात ठेवावा आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना पन्नास खोके मिळाल्याचे सांगावे आणि मी पण माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो, की आम्हाला पन्नास खोके कोणाकडूनही मिळाले नाहीत. एकदा महाराष्ट्रातील जनतेसमोर सोक्षमोक्ष होऊनच जाऊ द्या, अशा शब्दांत सांगोल्याचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यावर आधारित ‘मला काही सांगायचंय’ हे नाटक लवकरच येत आहे. त्यास प्रत्युत्तरादाखल शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही ‘पन्नास खोके-एकदम ओके’ नावाचे नाटक आणण्याची तयारी सुरू आहे. त्यावरून ठाकरे व शिंदे गटात पुन्हा वाद उफाळून येण्याची चिन्हे आहेत.

हेही वाचा : सकल मराठा समाज – मराठा क्रांती मोर्चा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावरून आमने-सामने

या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे गटाच्या आमदारांसोबत गुवाहाटी येथे हॉटेलमध्ये मुक्काम केलेले आणि तेथून ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल, समदं ओक्केमंदी’ हा अस्सल माणदेशी शैलीत संवाद साधल्याने संपूर्ण राज्यात चर्चेत आलेले सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून येणाऱ्या ‘पन्नास खोके-एकदम ओके’ या नाटकावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे.

ते म्हणाले, की आमच्यापैकी कोणीही आणि कोणाकडूनही पन्नास खोके घेतलेले नाहीत. हे आपण स्वतःच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगण्यास तयार आहोत. उद्धव ठाकरे यांनीही आदित्य यांच्या डोक्यावर हात ठेवून पन्नास खोके दिले गेल्याचे सांगावे. एकदाचा महाराष्ट्रातील जनतेसमोर त्याचा सोक्षमोक्ष व्हावा.

हेही वाचा : सातारा महामार्गालगतची वेळे प्रस्तावित औद्योगिक वसाहत रद्द, सरकारची अधिसूचना जारी

ते म्हणाले, की निवडणुकीच्या तोंडावर प्रचारकी थाटात नाटके येत राहतात. त्याची चर्चा करण्याची गरज नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यावर आधारित येणारे नाटक ‘मला काही सांगायचंय’ हे त्यांच्या कर्तृत्वावर आणि पुढील प्रगतीचा वेध घेणारे आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या काही मंडळींनी ज्या नाटकाची तयारी चालविली आहे, ते नाटक शुद्ध खोट्या कथानकावर आधारलेले आहे, अशी टीका त्यांनी केली