लोकसभा निवडणुकीत जागा वाटपात उशीर झाल्याने छगन भुजबळ यांनी माघार घेतली होती. नाशिक लोकसभा मतदारसंघातून त्यांचं नाव चर्चेत होतं. त्यांच्या नावाची शिफारस खुद्द अमित शाहांनीच केली होती, असंही छगन भुजबळ म्हणाले होते. परंतु, नाव जाहीर करण्यात उशीर होत असल्याने प्रचाराला वेळ मिळणार नाही. परिणामी त्यांनी उमेदवारीच्या शर्यतीतूनच माघार घेतली आणि त्याजागी हेमंत गोडसे यांना उमेदवारी देण्यात आली. दरम्यान, असा घोळ विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून छगन भुजबळांनी आत्ताच तिकिट वाटप जाहीर करा, असं महायुतीतील नेत्यांना सांगितलं आहे. त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना असं म्हटलंय.

छगन भुजबळ म्हणाले, “लवकरात लवकर युतीतल्या पक्षांनी एकत्र बसून तिकिट वाटपाचा प्रश्न सोडवावा. लहान भाऊ, मोठा भाऊ, मधला भाऊ काय ठरवायचं आहे ते लवकर ठरवा. कारण, आपण पाहत आहोत की पवार साहेब कामाला लागले आहेत. प्रचार सुरू झाला. तशा प्रचाराला सुरुवात करावी लागली. आपण तेच तेच करत बसलो चर्चेचं गुऱ्हाळ करत तर परत अडचणीत येऊ.”

हेही वाचा >> “मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

लोकसभेतून घेतली होती माघार

लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून राष्ट्रवादीच्या चिन्हावर छगन भुजबळांना संधी देण्यात येणार होती. त्यांच्या नावाची चर्चाही सुरू झाली होती. खुद्द केंद्राकडूनच त्यांच्या नावाची शिफारस झाल्याने छगन भुजबळांनाच तिकिट मिळेल अशी दाट शक्यता होती. परंतु, नाशिकच्या जागेवरून शिंदे गटही अडून बसला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही जागाच हवीच होती. त्यामुळे वाटाघाटी सुरू होत्या. या वाटाघाटीमुळे वेळ निघून गेला अन् शेवटच्या क्षणी ही जागा शिंदे गटाच्या पदरात पडली. दरम्यानच्या काळात नाव जाहीर करण्यात उशीर होत असल्याने आपल्याला प्रचाराला वेळ मिळणार नाही, असं सांगून छगन भुजबळांनीच या उमेदवारीच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांना संधी देण्यात आली.

परंतु, शिंदे गटाचा नाशिक लोकसभा मतदारसंघात दारुण पराभव झाला. ठाकरे गटाचे राजाभाऊ वाजे ६ लाखांच्या मताधिक्क्यांनी विजयी झाले. त्यामुळे आता विधानसभेत तरी योग्यवेळी जागा वाटप करून चर्चेचं गुर्हाळ करत बसू नका असं आवाहन छगन भुजबळांनी केलं आहे.

दरम्यान, लोकसभेतून संसदेत न गेलेल्या छगन भुजबळांना राज्यसभेतून संसदेत पाठवले जाईल अशी अटकळ बांधली जात होती. परंतु, ही अटकळही काल सपशेल अपयशी ठरली. कारण, काल (१३ जून) राज्यसभेवर सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड झाली आहे. या सर्व घटनांमध्ये छगन भुजबळ नाराज असल्याच्याही चर्चा आहेत. ते पुन्हा बंडखोरीच्या वाटेवर असल्याचंही सांगितलं जातंय. परंतु, लोकसभेत झालेला गोंधळ विधानसभेत होऊ नये याकरता त्यांनी लवकरात लवकर जागा वाटप जाहीर करण्याचे आवाहन केले आहे.