सोलापूर : घरजावई तरुणास पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणावरून झालेल्या भांडणात असह्य त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नी आणि सासूसह चौघांजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहोळ तालुक्यातील जामगाव येथे हा प्रकार घडला.बंडू आप्पा श्रीराम (वय ३४) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या संदर्भात त्याचा भाऊ नवनाथ आप्पा श्रीराम (वय ४०, रा. खुपसंगी, ता. मंगळवेढा) यांनी कामती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बंडू हा पत्नीसह दहा वर्षांपूर्वी सासुरवाडीत, जामगाव (मोहोळ) येथे राहून सासूच्या नावे असलेली शेतजमीन कसत होता. त्याने आपल्या गावातील स्वमालकीची स्थावर मालमत्ता विकून त्यातील पैसा सासुरवाडीतील शेतजमिनीत गुंतविला होता. यातून शेती विकसित होऊन चार पैसे मिळत होते.

तथापि, पुढे काही दिवसांनी पत्नीचे तिच्याच नात्यातील एका तरुणाबरोबर अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले. तेव्हा अस्वस्थ झालेल्या बंडू श्रीराम याने पत्नी व सासूला जाब विचारला. त्यावरून सासुरवाडीत भांडणे सुरू झाली. यातच पत्नीच्या प्रियकराचे वडील तेथे येऊन शेती कसू लागले. त्यामुळे भांडण-तंटा वाढला आणि बंडू यास त्रास देणे सुरू झाले.

वैतागलेल्या बंडू याने पत्नी, सासू व इतरांविरुद्ध कामती पोलीस ठाण्यात दोन वेळा तक्रारही नोंदवली होती. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट, सासुरवाडीत बंडू यास त्रास वाढू लागला. त्यामुळे अखेर सासुरवाडीत पत्नी, सासू, तसेच पत्नीचा प्रियकर आणि प्रियकराचे वडील अशा चौघांनी असह्य छळ करून त्यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.