छत्तीसगडमधील रायपूर येथे काँग्रेसचे ८५ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनात काँग्रेसचे जवळपास १५०० प्रतिनिधी उपस्थित होते. या अधिवेशनात काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. तसेच काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीदेखील आपले विचार मांडले. आपल्या भाषणादरम्यान सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे, असे सोनिया गांधी म्हणाल्या आहेत. सोनिया गांधींच्या या विधानामुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा >> औरंगाबाद शहराच्या नामांतरावर इम्तियाज जलील यांचे मोठे विधान; म्हणाले, “विरोध करत राहणार, भविष्यातही आम्ही…”
मोदी सरकारने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली
सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात मोदी सरकारवर सडकून टीका केली. “भारत देश तसेच काँग्रेससाठी हा आव्हानात्मक काळ आहे. भाजपा, आरएसएसने देशातील प्रत्येक संस्था ताब्यात घेतली आहे. तसेच या संस्था नेस्तनाबूत केल्या आहेत. काही उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेऊन मोदी सरकारने भारतीय अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे,” अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.
माझ्या प्रवासाचा समारोप…
सोनिया गांधी यांनी राजकीय संन्यास घेणार असल्याचेही यावेळी संकेत दिले. “डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली २००४ आणि २००९ साली लोकसभा निवडणुकीत आपला विजय झाला. यामुळे मी वैयक्तिकरित्या समानाधी आहे. मात्र माझ्या प्रवासाचा समारोप काँग्रेससाठी टर्निंग पॉईंट ठरलेल्या ‘भारत जोडो यात्रे’ने झाला, याचे मला जास्त समाधान आहे,” असेही सोनिया गांधी म्हणाल्या.