विधान परिषद किंवा विधानसभेत शोकप्रस्ताव मांडताना सदस्यांनी किती वेळ बोलावे, याचा वस्तुपाठ घालून देण्याची गरज आज विधान परिषदेत जाणवली. पाच-दहा नव्हे, तर तब्बल २५-३० मिनिटे प्रत्येक सदस्याने शोकसंवेदना व्यक्त केल्या. शेवटी सभापती शिवाजीराव देशमुख यांनी सदस्यांना वेळेची जाणीव करून दिली.
विरोधकांच्या गोंधळामुळे अर्धा तासासाठी तहकूब झालेली विधान परिषद सुरू झाल्यानंतर शोकप्रस्तावाची सुरुवात मुख्यमंत्र्यांनी केली. राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री बॅ. अब्दुल रहेमान अंतुले, माजी केंद्रीय मंत्री मुरली देवरा आणि माजी विधान परिषद सदस्य भास्कर शिंदे यांच्या निधनाबद्दल त्यांनी शोकभावना मांडल्या. त्यानंतर सुनील तटकरे यांनी अंतुले आणि त्यांच्यातील भावनिक संबंध उलगडताना  ‘लोकसत्ता’त प्रकाशित बॅ. अंतुले यांच्यावरील लेखाचा संदर्भ दिला. त्यानंतर माणिकराव ठाकरे, जयंत पाटील, कपील पाटील, दिवाकर रावते, भाई जगताप, जोगेंद्र कवाडे, अनिल तटकरे, सतीश टकले आदींनी त्यांच्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.