धाराशिव : दि. २५ : एसटीची भाडेवाढ झाली आहे. आता त्यापाठोपाठ चांगल्या सुधारणाही करणार आहोत. दरवर्षी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन पाच हजार बसेस दाखल होतील. पुढील पाच वर्षात एकूण २५ हजार नवीन बस गाड्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन ५० लालपरी बसगाड्या देत असल्याची घोषणा राज्याचे परिवहनमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री सरनाईक यांनी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्याला नवीन ५० लालपरी देत असल्याची घोषणा करीत पहिल्याच दौऱ्यात जिल्ह्याला आनंदाची बातमी दिली.

धाराशिव शहरात बसस्थानाकाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. एप्रिल महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल. आणि त्यानंतर हे सुसज्ज बसस्थानक प्रावशी बांधवांसाठी सुरू होईल. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजना सुरूच राहणार आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. अन्य राज्यातील एसटी कश्याप्रकारे चालते. याचा अभ्यास करून अन्य राज्यातील चांगली कामे आपल्या राज्यातही स्वीकारली जातील असेही मंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले. तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र विकसित करीत असताना भाविक, स्थानिक व्यापारी आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेऊनच विकासकामे केली जातील अशी ग्वाहीही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी दिली. त्यांच्यासमवेत आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.

Story img Loader