हर्षद कशाळकर
अलिबाग : एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्याला, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे नवी ओळख मिळाली आहे. पायाभूत सुविधांचे भक्कम जाळे जिल्ह्यात प्रस्थापित झाले आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यात आरोग्य सुविधांनाही चालना मिळत असून त्याचा परिणाम प्रामुख्याने माता-बाल आरोग्यस्थितीतून दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्याचे क्षेत्रफळ ७१५२ चौ. कि.मी. असून यात १५ तालुके आणि १ हजार ९०९ गावांचा समावेश आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २९ कोटी आहे. औद्योगिकरणामुळे राज्यातील इतर भागांच्या तुलनेत जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वार्षिक २ लाख १७ हजार ४१९ पर्यंत वाढले आहे. पुर्वी शेती आणि मासेमारी या दोन घटकांवर पुर्वी रायगड जिल्ह्याचे अर्थकारण अवलंबून होते. पण आता याची जागा उद्योग आणि पर्यटनाने क्षेत्राने घेतली आहे. त्यामुळे उत्पन्नासाठी शेतीवरील अवलंबित्व हळूहळू कमी होऊ लागले आहे. मुंबई आणि ठाणे यासारख्या महानगरांच्या शेजारी असल्याने रायगडचे भौगोलिक महत्त्व अनन्य साधारण आहे. त्यामुळेच मुंबईचा महानगर क्षेत्राचा विस्तार हा रायगड जिल्ह्याच्या दिशेने सुरू झाला आहे. यामुळेच रस्ते, रेल्वे आणि विमानसेवेचे भक्कम जाळे जिल्ह्यात विकसीत होऊ लागले आहे.
हेही वाचा >>>“प्रकल्पांना विरोध करण्याकरता ‘आंदोलनजीवी समाज’ तयार झालाय”, रिफायनरीचा उल्लेख करत फडणवीसांचा विरोधकांना टोला
दळणवळणांच्या सोयी सुविधांबरोबरच आरोग्य, शिक्षण आणि पाणी पुरवठा या घटकांचा विकासावर यंत्रणांनी लक्ष्य केंद्रीत केले आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागले आहेत. जिल्ह्यातील वैद्यकीय सेवांच्या सक्षमिकरणावर गेल्या काही वर्षांत भर दिला गेला आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा सुधारण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यात सध्या १४ शासकीय रुग्णालये, १० शासकीय दवाखाने. ५४ प्राथमिक आरोग्य केंद्र, २८८ उपकेंद्र आहेत. खाजगी रुग्णालयांची संख्याही गेल्या काही वर्षांत वाढली आहे. त्यामुळे आरोग्याचा स्तर उंचावण्यास मदत झाली आहे. गरोदर महिलांची नियमित तपासणी, त्यांना लोह गोळय़ांचे वाटप, जिल्ह्यात रुग्णालय बाह्य प्रसुतीचे प्रमाण बरेच कमी झाले आहे. त्यामुळे प्रसुती दरम्यान महिला आणि बालमृत्यूचे घट झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा >>>शासकीय दंत महाविद्यालयांमध्ये बहुकेंद्रीय संशोधन! वैद्यकीय शिक्षण खात्याचे लवकरच विशेष पोर्टल
स्वच्छता आणि पाणी पुरवठा यावर जिल्ह्याची कामगिरी लक्ष्यवेधी ठरली आहे. जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी रायगड जिल्हा परिषदेने केलेल्या विविध उपाययोजनाचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत अशुद्ध होण्याचे प्रमाण घटले आहे. गेल्या वर्षभरात एकाही ग्रामपंचायतीला पिण्याच्या पाण्याचे धोकादायक स्त्रोत असल्यामुळे दिले जाणारे लालकार्ड एकाही ग्रामपंचायतीला देण्यात आलेले नाही. त्यामुळे जलजन्य आजारांना आळा बसण्यास मदत झाली आहे. जिल्ह्यात शंभर टक्के गावे ही हागणदारी मुक्त झाली आहेत. त्यामुळे स्वच्छतेचा दर्जा उंचावला आहे.
शक्तिस्थळे :
कर्जत, खालापूर, रसायनी, पनवेल येथे शैक्षणिक हब. आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंदर विकास गतीने महामार्गाची कामे वेगाने.
आव्हाने : वाढत्या औद्योगिकीकरणाचा शेती, मासेमारीवर परिणाम. खरीपा लागवड क्षेत्रात दहा वर्षांत तीस हजार हेक्टरची घट
धोके : शेतीत यांत्रिकीकरणाचा आभाव आणि सिंचनाच्या सुविधेची कमतरता, कामगारांची चणचण प्रकल्प उभारणीत स्थानिकांकडून होणारा विरोध आणि भुसंपादनात येणाऱ्या अडचणी
संधी : पनवेल आंतरराष्ट्रीय विमानतळ, दिघी बंदर, अलिबाग-विरार बहुउद्देशीय मार्गिका, रेवस रेड्डी सागरी मार्ग यांमुळे जिल्ह्यातील दळणवळणाला चालना. पर्यायाने औद्योगिकीकरण, शहरीकरणालाही वेग.
दळणवळणांच्या सोयीसुविधांबरोबरच आरोग्य, शिक्षण आणि पाणीपुरवठय़ावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याने त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. वैद्यकीय सेवांच्या सक्षमीकरणावरही भर दिला गेला.