Supriya Sule on Swargate Rape case: गावी निघालेल्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुधवारी (२६ फेब्रुवारी) सकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. दत्तात्रय गाडे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची आठ पथके रवाना झाली आहेत. दरम्यान, या घटनेनंतर राज्यातील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे विरोधक राज्य सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या घटनेवरून सरकारला जाब विचारला आहे. सुप्रिया सुळे यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावरून एक्स या माय्क्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीची हिंमत होते ही बाब गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शवणारी आहे. या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यावर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली आहे याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे . यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे.

महिला सुरक्षेसाठी नीलम गोऱ्हे यांच्या प्रशासनाला सूचना

दरम्यान, शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी काही वेळापूर्वी स्वारगेट बस आगाराला भेट दिली. यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या, मला वाटतंय की आपले पोलीस लवकरात लवकर या प्रकरणातील आरोपीपर्यंत पोहोचतील. कारण पोलिसांकडे या प्रकरणाचे धागेद्वारे आहेत. आम्ही शिवशाही बसेसची पाहणी केली आहे. बसमधील चालकाच्या मागे असलेलं दार बंद केल्यावर बसमध्ये बसलेला एखादा प्रवासी कितीही ओरडला तरी त्याचा आवाज चालकापर्यंत पोहोचत नाही असं आमच्या निदर्शनास आलं आहे. आम्ही बस बंद करून पाहिली. बंद बसमधील व्यक्ती कितीही ओरडली तरी बाहेर आवाज येत नाही ही गोष्ट देखील निदर्शनास आली आहे. ही वस्तुस्थिती पाहून काही उपाययोजना करण्यास आम्ही प्रशासनाला सूचना केल्या आहेत. रात्री बस पोहोचल्यावर बसेसची साफसफाई झाल्यानंतर त्या सील कराव्या आणि दुसऱ्या दिवशी बस चालक व वाहकाच्या ताब्यात देताना सील उघडून सर्व खातरजमा करूनच त्यांच्या ताब्यात द्यायला हव्यात, असं आम्ही आगार व्यवस्थापनाला सुचवलं आहे.