Supriya Sule on Walmik Karad Case : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलं आहे. या प्रकरणी वाल्मिक कराडला अटक झाली असून त्याच्यावर खंडणीअंतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे. अंजली दमानिया, जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस यांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर आता खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणातील एक वेगळाच मुद्दा उचलून धरला आहे. या मुद्द्यावर त्या थेट अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याशीही चर्चा करणार आहेत. आज सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी आवाज उचलला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाल्मिक कराडवर आधीच खंडणीअंतर्गत गुन्हा दाखल होता. खंडणीविरोधात पीएमएलए कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जातो. मग वाल्मिक कराडप्रकरणी ईडी आणि पीएमएलएची अंमलबजावणी का करण्यात आली नाही, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारला विचारला. खंडणीप्रकरणी कंपनीने मे महिन्यात नोटीस पाठवली होती. त्यामुळे वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल असतानाही ईडीने कारवाई का केली नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला. यावेळी सुप्रिया सुळे यांनी वाल्मिक कराडविरोधातील सर्व एफआयआरची प्रत माध्यमांना दाखवली.

या गुन्ह्यासंदर्भातील माहिती राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवली नव्हती का? त्यामुळे मी आणि बाप्पान (खासदार बजरंग सोनावणे) अर्थमंत्रालयाला पत्र लिहिणार आहोत. महाराष्ट्रात गुंतवणूक येणार असतील आणि अशी खंडणी होणार असेल तर महाराष्ट्रात गुंतवणूक कशी येणार? गुंतवणूकदारांनाही न्याय मिळणार नाही का? या प्रकरणात ईडी आणि पीएमएलएची कारवाई झाली नाही. संतोष देशमुखांची हत्या ही एक केस, आर्थिक फसवणुकीचा दुसरा गुन्हा. मग यात ईडी का गुंतली नाही? वाल्मिक कराडला सातत्याने विशेष ट्रिटमेंट का दिली जाते? मे महिन्यात जो गुन्हा दाखल झाला त्याविरोधात कारवाई झाली असती तर संतोष देशमुखांची हत्याच झाली नसती. याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळेंना पाहिजेत या तीन प्रश्नांची उत्तरे

“लाडकी बहीण योजनेचे परळी तालुक्यातील कमिटीचे अध्यक्ष आजही वाल्मिक कराड आहेत. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर ही योजना आली. लोकसभेच्या आधीच वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा होता. ज्याच्यावर खंडणीचा गुन्हा त्याला लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष करता? त्यामुळे माझे तीनच प्रश्न आहेत, ईडी आणि पीएमएलए अंमलबजावणी का झाली नाही, क्रूर हत्येला ३० दिवस झाले, यातील एक खूनी अद्याप फरार आहे, त्याला कधी अटक करणार? खंडणीचा गुन्हा असलेल्या व्यक्तीला परळी तालुक्यातील लाडकी बहीण योजनेचा समितीचा अध्यक्ष का केला?” असे संतप्त सवाल सुप्रिया सुळेंनी मांडले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supriya sule demand ed and pmla action in walmik karad case sgk