Supriya Sule : महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. या निवडणुकीच्या आधीच महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश सरकारप्रमाणे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली. ही योजना निवडणुकीपुरतीच आहे असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जातो आहे. दरम्यान सुप्रिया सुळे यांनी एक पोस्ट केली आहे. त्यात महाराष्ट्र सरकारने तिजोरीत खडखडाट केल्याचा आरोप सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) केला आहे.

४० हजार कोटींची देणी बाकी

सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की महाराष्ट्र सरकारने कंत्राटदारांची ४० हजार कोटींची देणी बाकी ठेवली आहेत. यासाठी त्यांनी एका प्रतिथयश वृत्तपत्रातील बातमीचा फोटोही पोस्ट केला आहे. तसंच सरकारने ९६ हजार कोटींची निवडणूकपूर्व उधळपट्टी सरकारने केली असल्याचा आरोपही केला आहे. आरोप करताना त्यांनी लाडकी बहीण योजनेचं नाव थेट घेतलेलं नाही. मात्र त्यांचा अंगुलीनिर्देश त्याच योजनेकडे आहे, असं दिसून येतं आहे. सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) यांनी या पोस्टमध्ये महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

काय आहे सुप्रिया सुळेंची पोस्ट?

‘अंथरुण पाहून पाय पसरावे’ ही म्हण शहाणी माणसं नेहमी वापरतात. शासनाच्या कारभारालाही ही म्हण लागू पडते. खर्चाचा आणि उत्पन्नाचा मेळ जमला नाही तर कर्जाच्या ओझ्याखाली दबावे लागते. सध्या महाराष्ट्र शासनाची हीच गत झालीय. निवडणूकांच्या तोंडावर सवंग घोषणा करुन भाजपाप्रणीत तिघाडी सरकारने महाराष्ट्राची तिजोरी रिकामी करुन प्रत्येकाच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करुन ठेवलाय. सध्या सरकारकडे कंत्राटदारांची ४० हजार कोटी रुपयांची देणी बाकी आहे.हा डोंगर एकीकडे आणि दुसरीकडे ९६ हजार कोटी रुपयांची निवडणूकपूर्व उधळपट्टी सरकारने केली आहे. कंत्राटदारांची देणी थकल्यामुळे त्यांच्या संघटनेने तसेच अभियंत्यांनी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याची घोषणा केलीय.सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याचा हा मोठा पुरावा आहे.” असा आरोप सुप्रिया सुळेंनी ( Supriya Sule ) केला आहे.

सुप्रिया सुळेंनी हे आरोप केले आहेत. या पोस्टवर लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकसभेत सुप्रिया सुळे यांना इंदापूरमध्ये मोठा लीड मिळाला होता. सुप्रिया सुळे यांच्या विजयावर आता पक्षात येताच हर्षवर्धन पाटील यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ‘सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य हात होता, आभार मानण्यासाठी उभा आहे,’ असं वक्तव्य हर्षवर्धन पाटील यांनी केलं होतं. आता त्यानंतर सुप्रिया सुळेंनी महायुती सरकारवर आता टीका केली आहे.