Supriya Sule : महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत जे यश मिळालं त्यानंतर त्यांचा आत्मविश्वास प्रचंड दुणावला आहे. महाराष्ट्रात परिवर्तन होईल असं शरद पवार काही दिवसांपूर्वी म्हणाले होते. आता दीड ते दोन महिन्यांत आपलं सरकार येईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. सुडाचं राजकारण जे कुणी करत आहेत तसं सुडाचं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं नव्हतं असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. त्याचप्रमाणे महत्त्वाचा विश्वासही व्यक्त केला.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लवकरच

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. दोन दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. महाराष्ट्रातल्या निवडणुका या २६ नोव्हेंबरपूर्वी होतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता निवडणूक पुढे ढकलण्याचा विषय मागे पडला आहे हेच दिसून येतं आहे. २०१९ पेक्षा सध्याचं महाराष्ट्रातलं राजकीय चित्र पूर्णपणे वेगळं आहे. त्यामुळे निवडणुकीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

२०१९ ते २०२४ या कालावधीत काय घडलं?

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना झाला होता. या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना युतीला लोकांनी कौल दिला. मात्र मुख्यमंत्रिपदावरुन दोन्ही पक्षांमध्ये विकोपाचे मतभेद झाले आणि महाविकास आघाडीचा जन्म झाला. त्यानंतर उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तर २१ जून २०२२ ला एकनाथ शिंदेंनी सर्वात मोठं बंड केलं आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. शिवसेनेत उभी फूट पडली. त्यानंतर वर्षभराने म्हणजेच २ जुलै २०२३ ला अजित पवार महायुतीत आले. त्यामुळे राष्ट्रवादीची दोन शकलं झाली. महाराष्ट्रातली सद्य स्थिती अशी आहे की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा यांची महायुती, तर काँग्रेस, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष अशी महाविकास आघाडी अशी महाविकास आघाडी, शिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी असे पक्षही आहेतच. त्यामुळे निवडणुकीत काय होणार हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. या सगळ्या गोष्टी घडत असतानाच सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना टोला लगावला आहे आणि दीड ते दोन महिन्यांत आपलंच सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

“पुणे जिल्ह्याने आतापर्यंत अनेक पालकमंत्री पाहिले पण असं सुडाचं राजकारण कधी पाहिलं नाही, असं वक्तव्य करत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. दीड ते दोन महिन्यांनी आपलंच सरकार येणार आहे. जेव्हा आपलं सरकार येईल तेव्हा सगळ्यांना अगदी विरोधकांनाही सन्मानाने वागवू.”,असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.