राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडिया अकाऊंटवरून जीवे मारण्याची धमकी आल्याचं समोर आलं आहे. “तुमचाही लवकरच दाभोलकर होणार”, अशी धमकी शरद पवारांना देण्यात आली असून त्या पोस्टमध्ये त्यांना शिवीगाळही करण्यात आली आहे. या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्यावर आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करणार असल्याचं सांगितलंय, असं सुप्रिया सुळेंनी माध्यमांना सांगितलं.

मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. “मला व्हॉट्सअॅपवर आज हा मेसेज आला. एका वेबसाईटवरून अशी धमकी दिली जात आहे. त्या व्यक्तीच्या फॉलोअर्सच्याही काही कॉमेंट्स आल्या आहेत. हे आक्षेपार्ह आहे. अशा धमक्या आल्या असतील, तर गृहमंत्रालयाने याची नोंद घ्यावी. मी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना यासंदर्भात माहिती दिली आहे. शरद पवारांना ज्या पद्धतीने ही धमकी आली आहे. ते दुर्दैवी आहे”, असं सुप्रिया सुळे यावेळी म्हणल्या.

“हे गुंडाराज नाही तर काय आहे?”

“राजकारणात मतभेद जरूर असतात. इतका द्वेष आज समाजात पसरवला जात आहे. सोलापुरात एक मुलगा दोन मुलींबरोबर कॉफी पीत होते. तिथे त्यांचे प्राध्यापकही होते. त्यावेळी काही मुलांनी त्या मुलाला मारहाण केली की तू त्या दोन मुलींशी का बोलतोय? कुणीही कसंही वागू शकतो का? हिंमतच कशी होते मारण्याची? तिथे एक प्राध्यापकही आहेत. त्यांचाही सन्मान करणार नाहीत तुम्ही? ही कसली संस्कृती आहे? ही दडपशाही आहे. हे गुंडाराज नाही तर काय चाललंय हे?” असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.

मोठी बातमी: “तुमचाही दाभोलकर होणार”, शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी!

“या धमकीवर त्या अकाऊंटवर लोकांच्या आलेल्या कॉमेंट्स पाहा. या सगळ्या कॉमेंट्स कुठून येतात? हे द्वेषाचं राजकारण आहे. यावर महाराष्ट्र सरकारने कठोर कारवाई करावी अशी माझी सरकारकडे मागणी आहे. या सगळ्याची जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर आणि गृहमंत्रालयावर आहे. हे असे प्रकार म्हणजे घाणेरडं राजकारण आहे. असे प्रकार थांबायला हवेत. शरद पवारांची सुरक्षा ही गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे. आयुक्तांनी तातडीने कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलंय. बघुयात काय होतंय”, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“जर यात काही झालं…”

“मी एक महिला म्हणून आणि एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशाच्या गृहमंत्र्यांना न्याय मागतेय. जर काही झालं, तर त्याला जबाबदार फक्त देशाचे आणि राज्याचे गृह मंत्रालय असेल”, असा इशाराच सुप्रिया सुळेंनी यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकारला दिला.

Story img Loader