Suresh Dhas : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर जवळपास तीन महिने उलटले तेव्हा धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंची शपथ व्हायला नको होती अशी प्रतिक्रिया दिली. पंकजा मुंडेंनी हे बोलण्यासाठी उशीर केल्याचं भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले सुरेश धस?

‘धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, की धनंजय मुंडेंना मंत्रीपदच द्यायला नको होतं. त्यांच्या राजीनामा खूप आधी घ्यायला हवा होता. पंकजाताईंना हे बोलायला फार उशीर झाला. हत्ती गेला अन् शेपटासाठी बोलल्यात. शेपटाच्या वेळी बोलून काय उपयोग. पंकजा मुंडेंची प्रतिक्रीया फार आधी यायला हवी होती. संतोष देशमुखच्या घरी आधी त्यांनी जायला पाहिजे होतं. संतोष देशमुख कोण आहे? त्यांच्याच पक्षाचा बुथप्रमुख. मस्साजोग हे गाव मराठा बहुल गावात एजंट होणंसुद्धा पाप होईल एवढी गंभीर परिस्थिती होती. पंकजा मुंडेंचा संतोष देशमुखांनी सत्कारही केला होता. बुथप्रमुख जर मतदानाच्या वेळी नसेल तर धपाधप बोगस मतदान होईल. त्या बुथवर थांबला ना संतोष…’ पंकजाताईंविषयीची नाराजी ही आहे की त्यांनी तिथे जाऊन भेटायला हवं होतं. पण त्या गेल्या नाहीत. सगळं झाल्यानंतर आता तुम्ही म्हणतायत की धनंजय मुंडेंना मंत्रीपदच द्यायला नको होतं. तेंव्हाच का नाही म्हणालात? असा सवाल सुरशे धसांनी केला.

वाल्मिक कराड धनंजय मुंडेंच्या जवळचा होता…

घटना ९ तारखेला घडली होती. १४ तारखेला मंत्रीमंडळाचा विस्तार होता. त्यामुळं मंत्रीमंडळात कोणाला घ्यायचं हा तेंव्हा प्रश्नच नव्हता. भाजपाचा त्याच्याशी संबंध नाही. त्यात अजित दादा, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, यांचा विषय होता. त्यामुळे या दोन तीन नेत्यांनी तो विचार करायला पाहिजे होता. १३ तारखेला तिथे जाऊन म्हणायला हवं होतं मला द्या नाहीतर नका देऊ पद. पण धनंजय मुंडेंना मंत्रीपद देऊ नका. का देऊ नका कारण वाल्मिक अण्णा धनंजय मुंडेंच्या जवळचा होता. वाल्मिक इव्हेंट मॅनेजमेंटवाला होता. पंकजा ताईंचाही सत्कार त्यानं केला होता.त्याच्या इव्हेंट मॅनेजमेंटला पंकजाताईही हुरळूनच गेल्या. वाल्मिकनं उधळलेल्या पाकळ्या तुम्हीही घेतल्याच होत्या. असेही सुरेश धस म्हणाले.

४ मार्च रोजी धनंजय मुंडे यांचा राजीनामा

९ डिसेंबर २०२४ या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मारेकऱ्यांना अटक केली. वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला शरण आला. वाल्मिक कराड हाच या हत्येमागचा मुख्य सूत्रधार असल्याचं सीआयडी तपासात समोर आलं. तसंच मागच्या मंगळवारी म्हणजेच ४ मार्चला धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. कारण आदल्या दिवशी रात्रीच संतोष देशमुखांच्या हत्येचे क्रूर फोटो व्हायरल झाले. या सगळ्या घटनाक्रमावर आता माझा कट्टा या कार्यक्रमात सुरेश धस यांनी भाष्य केलं आहे.

Story img Loader