शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. याशिवाय त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्नही विचारला आहे. शिवसेनेची(ठाकरे गट) सध्या राज्यभर महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. यानिमित्त सुषमा अंधारे या विविध जिल्ह्यांमध्ये सभा घेत आहेत. काही दिवसांअगोदर त्या जळगावमध्ये होत्या, त्या दरम्यान मंत्री गुलाबराव पाटील आणि त्यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक युद्ध रंगल्याचं दिसून आलं. सुषमा अंधारेंच्या सभेला परवानगीही नाकारली गेली. तर काही ठिकाणी त्यांची जोरदार सभा झाली. यावरून राजकीय वर्तुळात बऱ्याच चर्चा सुरू झाल्या. दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी शिंदे गट आणि भाजपावर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“अब्दुल सत्तारांवर कारवाईसाठी दाखवलेली तत्परता गुलाबराव पाटलांच्या वेळी का नाही?”; सुषमा अंधारे यांचा महिला आयोगाला सवाल!

सुषमा अंधारे म्हणाल्या, “अगदी तीनच दिवसांपूर्वी गुलाबराव पाटील जे कायम आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसांठी प्रसिद्ध असतात, कुप्रसिद्ध असतात हा शब्द जरा जास्त चांगला ठरेल. त्यांना असं सातत्याने वाटतं की त्यांचा सरंजामी माज सगळे लोक सहन करतील आणि ते ज्या पद्धतीने बोलतात देवेंद्र फडणवीस तुम्हीच बघा हे किती वाईट आहे, की आपल्या मंत्रिमंडळातील एक मंत्री जाहीरपणे म्हणतो, की बाई आहे म्हणून सोडून देतोय. माणूस असता तर दाखवून दिलं असतं. पण हे वाक्य देवेंद्र फडणवीसांना किंवा गृहमंत्रालयाला अजिबात चिथावणीखोर वाटत नाही. तीन दिवसांपूर्वी माझ्या जळगावच्या महाप्रबोधन दौऱ्यात ज्या सभा सुरू होत्या, त्यातील चार सभा अत्यंत उत्सफुर्त प्रतिसादात पार पडल्या. जेव्हा शिंदे गट आणि भाजपाच्या असं लक्षात आलं, की या सभांमुळे जनमत हलत आहे. तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि त्यांनी मला मुक्ताईनगरची सभा घेण्यापासून मज्जाव केला.”

हेही वाचा – “२४ तासांच्या आत नाक घासून सुप्रिया सुळेंची माफी मागा, अन्यथा…”; अब्दुल सत्तारांना राष्ट्रवादी काँग्रेसचा अल्टिमेटम!

याचबरोबर “मी प्रसारमाध्यमांच्या समोर हे अत्यंत जबाबदारीने सांगायला हवे, की या सगळ्यांमध्ये माझ्याविरोधात जळगाव पोलीस स्टेशन, धरणगाव पोलीस स्टेशन, पाचोरा, चोपडा, मुक्ताईनगर किंवा एरंडोल यापैकी कुठल्या पोलीस स्टेशनमध्ये एकही एफआयर नोंद झालेली नाही. साधी प्रतिबंधात्मक कारवाई सुद्धा नाही. मला कुठलीही नोटीसही दिली गेलेली नाही. माझ्या सभांना मी रीतसर परवानगी घेतली होती. जर मी सभांना रीतसर परवानगी घेतली होती. तर गुलाबराव पाटील पोलिसांना अशा पद्धतीच्या ऑर्डर देऊन मला ओलीस कसं ठेवू शकतात? आणि पोलिसही गुलाबराव पाटलांचे हस्तक बनून कसं काय काम करू शकतात?” असं म्हणत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सुषमा अंधारेंनी प्रश्न उपस्थित केला.

हेही वाचा – ‘जे’ औरंगजेबलाही जमलं नाही ते आता उद्धव ठाकरे करत आहेत – आशिष शेलार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सवाल –

याशिवाय “देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री आहात, गृहमंत्री म्हणून शपथ घेताना आपण माध्यमांच्या आणि जनतेच्या समोर मान्य केलं आहे, की मी कुणाबद्दलही अधिकचा आकसभाव किंवा अधिकचा ममत्वभाव न बाळगता, माझ्या निदर्शनास आणून दिलेली बाब मी निरपेक्षपणे पार पाडेल. मग देवेंद्र फडणवीस मला सांगा, एक महिलेला तिच्याविरोधात पोलिसात कुठलीही तक्रार नसताना, ९ तारखेपासून महाप्रबोधन यात्रेत एकही शब्द सुषमा अंधारेच्या तोंडातून आक्षेपार्ह निघालेला नसतानाही, जर केवळ आणि केवळ मंत्री महोदयाच्या म्हणण्यामध्ये येऊन जर पोलीस विभाग मला ओलीस ठेवत असेल, तर तुम्ही यावर चकार शब्द बोलणार नाहीत का?” अशा शब्दात अंधारे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना सवाल केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushma andhare criticizes bjp and shinde group msr
Show comments