सोलापूर : तामिळनाडूतील एका मराठी सराफाने रेल्वे प्रवास करीत असताना त्याच्याजवळील सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली पिशवी लंपास करणारे संशयित चोरटे सोलापूर व सांगलीतील निघाले. त्यांना हस्तगत किंमती ऐवजासह ताब्यात घेऊन सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तामिळनाडू पोलिसांच्या हवाली करण्याची भूमिका बजावली.

गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांना संशयितांपर्यंत पोहोचता आले. स्वप्नील तानाजी चव्हाण (रा. लोहगाव, ता. जत, जि. सांगली), विजय कुंडलिक गंगले, अंकित सुभाष माने (दोघे रा. सांगोला), चैतन्य विजय शिंदे, गौरव मसाजी वाघमारे (रा. कान्हापुरी, ता. पंढरपूर) आणि अमर भारत निमगिरे (रा. जेऊरवाडी, ता. करमाळा) अशी अटक केलेल्या सहा संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून ७०० ग्रॅम वजनाचे आणि ४२ लाख रुपये किंमतीचे सोने तसेच १२ लाख रुपयांची रोकड असा एकूण ५४ लाख रुपयांचा चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

हेही वाचा – महाबळेश्वरला १६० मिमी पाऊस; जिल्ह्यातील सर्व धरणे तुडुंब

यासंदर्भात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ महाराष्ट्रात राहणारे आणि सराफा व्यवसायाच्या निमित्ताने तामिळनाडूत स्थायिक झालेले सुभाष विलास जगताप (रा. कोईमतूर, ता. तामिळनाडू) हे १६ जून २०२३ रोजी सोन्याच्या दागिन्यांचा संबंधित व्यापाऱ्यांना पुरवठा करून मुंबईच्या लोकमान्य टिळक एक्स्प्रेसने बंगळुरूहून कोईमतूरला परत निघाले होते. दूर अंतराच्या या प्रवासात, तामिळनाडूमध्ये तिरपूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे साडेपाचच्या सुमारास जगताप हे साखरझोपेत असताना चोरट्यांनी त्यांची नजर चुकवून ९०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली किंमती पिशवी लंपास केली होती. तामिळनाडू पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे महाराष्ट्रातील सांगली व सोलापूर जिल्ह्यातील असल्याची शक्यता वर्तविली होती. त्या अनुषंगाने तामिळनाडू पोलिसांच्या पथकाने सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची भेट घेऊन गुन्ह्याच्या तपासाकामी मदत मागितली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना त्या अनुषंगाने सूचना दिल्या. पोलीस निंबाळकर यांनी गुन्हे शाखेचे एक पथक तयार करून तामिळनाडू पोलीस पथकासोबत सांगोल्यात पाठविले. तेथे मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या गुन्ह्याचा छडा लागला.

हेही वाचा – विधानसभेच्या चाचपणीसाठी राज ठाकरे सोलापुरात

या गुन्ह्याची उकल होण्यासाठी सहायक फौजदार नारायण गोलेकर, हवालदार हरिदास पांढरे, गणेश बांगर, सलीम बागवान, पोलीस नाईक धनराज गायकवाड आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.