पुण्यात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मागच्या आठवड्यापासून चर्चेत आहे. पुण्यातील नामांकित रुग्णालय अशी ओळख असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर या प्रकरणी हलगर्जीपणाचा आरोप होतो आहे. रुग्णालयाने उपचारांसाठी १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली, ती न दिल्याने उपचारांना उशीर झाला आणि तनिषा भिसे दगावल्या असा आरोप होतो आहे. या प्रकरणानंतर महाराष्ट्रात राजकारण तापलं आहे. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्य विभागाच्या समितीचा अहवाल समोर आला आहे. या अहवालात दीनानाथ मंगेशकरावर ठपका ठेवण्यात आला आहे.
विजय वडेट्टीवार यांची मंगेशकर कुटुंबावर टीका
दरम्यान तनिषा भिसे यांच्या मृत्यू प्रकरणावरुन विजय वडेट्टीवार यांनी आता थेट मंगेशकर कुटुंबावर टीका केली आहे. लता मंगेशकर आणि संपूर्ण मंगेशकर कुटुंब माणुसकीला कलंक आहे असं म्हटलं आहे. तसंच यांनी कधी कुणाला दान केलं का? असाही सवाल वडेट्टीवार यांनी केला.
मंगेशकर कुटुंब माणुसकीला कलंक
“तनिषा भिसे मृत्यू प्रकरण मी वाचतो आहे. मंगेशकर कुटुंब म्हणजे लुटारुंची टोळी आहे. त्यांच्यापैकी कुणी कधी दान केलं आहे का? चांगलं गाणं म्हटलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं. लतादीदी, आशादीदी, हे दीदी, ते दीदी यांनी लोकांसाठी आणि देशासाठी काय केलं? खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही मंगेशकरांनी तर हे माणुसकीला कलंक आहेत असं मी म्हणतो. अशा पद्धतीने रुग्णालय चालवत असतील तर मंगेशकर कुटुंब कलंक आहेत.” असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
आमदार अमित गोरखे यांनी काय मागणी केली आहे?
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या बाबतीत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. दरम्यान, तनिषा सुशांत भिसे यांच्या दोन मुलींचं सामाजिक भान ठेवून १८ व्या वर्षांपर्यंत मंगेशकर कुटुंबाने मातृत्व स्वीकारावं अशी मागणी भाजपा आमदार अमित गोरखे यांनी केली आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे काम पूर्वीपासून चांगलं आहे; पुढे ही ते असेच करत राहतील. परंतु, डॉ. घैसास यांच्याकडून चूक झाली. त्यांनी स्वतः राजीनामा दिला आहे. राजीनामा महत्त्वाचा नाही. डॉ. घैसास असतील किंवा इतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी अमित गोरखे यांनी केली आहे. पुढे ते म्हणाले, मंगेशकर कुटुंबीयांनी सामाजिक भान ठेवून त्या दोन मुलींचं मातृत्व १८ व्या वर्षांपर्यंत घेतलं पाहिजे. अशा घटनांमध्ये संस्था जबाबदार असते असं गोरखे यांनी म्हटलं आहे.