उमरगा - उमरगा तालुक्यातील येणेगूर येथे महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे पुन्हा अपघात झाला. दोन शाळकरी मुलींना भरधाव टँकरने धडक दिल्याने एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संतप्त नागरिकांनी शाळकरी विद्यार्थ्यांसह सोलापूर-हैद्राबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन करत तब्बल साडेपाच तास महामार्ग रोखून धरला होता. येथील कॅप्टन जोशी विद्यालयातील दोन विद्यार्थिनी श्रेया सुरेश पात्रे इयत्ता सातवी व श्रद्धा श्रीकांत कांबळे इयत्ता सहावीतील या दोन्ही विद्यार्थिनी बुधवारी पावणे दहाच्या सुमारास, सकाळी रस्त्याच्या कडेने शाळेला जात असताना, जनावर बाजार मैदानासमोर भरधाव वेगात उमरग्याच्या दिशेने जाणार्या टँकरने या दोन विद्यार्थिनींना चिरडल्याने श्रेया पात्रे ही जागेवरच मयत झाली तर श्रद्धा कांबळे ही गंभीर जखमी झाली आहे. अपघात होताच ग्रामस्थांनी जखमी मुलीस उमरगा येथे उपचारासाठी पाठवले असता पुढील उपचारासाठी सोलापूर येथे पाठवण्यात आले. तर मयत मुलीस प्राथमिक आरोग्य केंद्र येणेगूर येथे शवविच्छेदन करिता दाखल करण्यात आले. हेही वाचा - ‘आधी बिहारची निवडणूक, मगच खासदारकीचा विचार…’ भाजपच्या मोठ्या नेत्याची स्पष्टोक्ती अपघात घडताच संतप्त नागरिकांनी टँकरचालकास आडवून पोलिसांच्या ताब्यात दिले. येणेगूर येथील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी दोन्ही बाजूचा राष्ट्रीय महामार्ग अडवत प्रशासनाच्या नावाने बोबा मारत आम्हाला न्याय पाहिजे, अशा घोषणा दिल्या. जिल्हाधिकारी व संबंधित गुत्तेदार आल्याशिवाय महामार्ग मोकळा केला जाणार नाही. केवळ गुत्तेदाराच्या हलगर्जीमुळे महामार्गावर आणखीन किती बळी जाणार असे म्हणत आपल्या भूमिकेवर ठाम होते. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहनाच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान एका सायकल स्वरास या टँकरने चिरडले असते. तो बालबाल बचावला, तर सायंकालचा चक्काचूर झाला आहे. घटनास्थळावर चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी हंबरडा फोडला होता. हेही वाचा - जिल्हाभरात बंदला प्रतिसाद, जरांगेंना समर्थन; धाराशिवमध्ये बसवर दगडफेक जखमी व मयत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी, फुटपाथ रस्ता तात्काळ सुरु करावे, तीन ठिकाणी झेब्रा क्रॉसींग करणे, दोन्ही शाळेसमोर लोखंडी ब्रीज करणे, स्टॅन्ड समोरील ब्रीज रद्द करणे, या अपघाताच्या घटनेशी संबंधीत सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याची प्रत गावकर्यांना तत्काळ देणे, अशी मागणी करत घोषणाबाजी करत ग्रामस्थ व विद्यार्थी आक्रमक झाले होते. जिल्हाधिकारी आल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला होता. या दरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.