सांगली : शाळकरी मुलांची मैत्री ही अनोखीच असते. मैत्रीसाठी काय पण करायला लावणारी ओढ वेगळीच असते. अशा ओढीतून पाचवीत शिकणार्या मुलांनी पालकांनी खाउसाठी दिलेले रूपये -दोन रूपये जमा करून औषध खर्चाची जुळवणी केली. मैत्रीची ही कहाणी घडली ती तासगाव तालुक्यातील नागाव कवठ्याच्या जिल्हा परिषद शाळेत.
शाळेतील एका गरीब घरातील मुलाच्या अंगावर पुरळ उठले होते. त्याच्या पालकांकडून औषधपाणीही करता येण्यासारखी स्थिती नव्हती. दिवसभर हा मुलगा वर्गात बसला असताना पुरळ उठलेल्या ठिकाणी खाजवत असे. त्याची अवस्था पाहून पाचवीत शिकणार्या त्याच्या आठ दहा मित्रांनी पैशाची त्याच्या औषधासाठी घरातून खाउसाठी म्हणून पैसे आणण्याचे ठरविले. यातून काही रक्कम जमा झाली. ही सर्व रक्कम खाउसाठी खर्च न करता मित्राच्या औषधासाठी खर्च करण्यात आली. यातून औषध दुकानातून औषधही आणून मित्राला देण्यात आले. या औषधामुळे मित्राच्या अंगावरील ९० टक्के पुरळ आणि व्रण कमी झाले आहेत. मित्रासाठी काही तरी केल्याचे अथवा उपकार केल्याची भावनाही या मित्रांमध्ये नव्हती. त्यांनी ही बाब शिक्षक अथवा पालकांनाही सांगितली नाही.
हेही वाचा: आरे कारशेड प्रकरण; महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
मात्र, या मित्रामध्ये असलेल्या एका मुलाच्या वडिलांना तब्बल १५ दिवसांनी या घटनेची कुणकुण लागली. त्यांनी चौकशी केली असता मित्रासाठी मित्रांनी केलेले हे कर्तव्य केवळ मैत्रीखातर होते यात सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून सांगितले नाही अशीच प्रत्येक मुलाची भूमिका होती. या घटनेची माहिती चर्चेतून समजताच गावातील डॉ. संदीप पाटील यांनी या मित्रसमूहाची भेट घेउन या मुलांना खाउसाठी प्रत्येक १०१ रूपये आणि आजारी मुलाच्या औषधासाठी एक हजार रूपये देउन अजाणत्या वयातील मैत्रीला सलाम केला. मुलांच्या अनोख्या मैत्रीमध्ये हर्षवर्धन सुर्यवंशी, अर्णव साळुंखे, तेजस कांबळे, शिवरत्न पाटील, सनी शिरतोडे, साहील मुलाणी, हर्षवर्धन कांबळे, पार्थ रूईकर, रूद्रप्रताप सुर्यवंशी, वरद पाटील, सोहम सुतार या चिमुकल्यांचा समावेश आहे.