सांंगली : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग सांगलीजवळच्या पूरपट्यातून जात असल्याने याची गांभीर्याने दखल घेउन भरावामुळे सांगलीला  महापूराचा धोका अधिक असल्याचे संबंधित प्रशासकीय यंत्रणेच्या नजरेस आणावे अशी सूचना बुधवारी झालेल्या आपत्ती निवारण समितीच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी केली.संभाव्य पूरस्थितीला सामोरे जाण्यासाठी आणि करायच्या विविध योजनाबाबत चर्चा करण्यासाठी आयुक्त शुभम गुप्ता यांनी आज सामाजिक संस्था व कार्यकर्ते यांची बैठक बोलावली होती. महापूर स्थिती उद्भवल्यास तातडीने कोणती पावले उचलावीत यावर यावेळी कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या.

यावेळी कॉ. उमेश देशमुख यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाबाबत कालच प्रसिध्द झालेल्या शासनाच्या अधिसूचनेचा उल्लेख करत सांगितले, प्रस्तावित महामार्ग माधवनगरच्या पश्‍चिम भागातून कर्नाळ, पद्माळे, सांगलीवाडी या परिसरातून जाणार आहे. या महामार्गासाठी भराव टाकण्यात आल्यानंतर कृष्णेचे विस्तारित होणारे पाणी निचरा होण्यासाठी अल्प संधी मिळणार असून यामुळे विस्तारित भागालाही महापूराचा धोका निर्माण  होणार आहे. याची माहिती  संबंधित यंत्रणेला महापालिकेने उपलब्ध करून द्यावी. वस्तुस्थिती दर्शवून प्रस्तावित महामार्गाचे आरेखन कसे आहे याची तज्ञांमार्फत तपासणी करावी  अशी सूचना मांडली.

हेही वाचा >>>“शरद पवार यांच्या ८५ व्या वाढदिवसानिमित्त ८५ आमदार निवडून देऊ”; रोहित पवार यांचा निर्धार!

दरम्यान, जिल्ह्यातील कवठेमहांकाळ, मिरज आणि तासगाव तालुक्यातून शक्तीपीठ महामार्ग प्रस्तावित असून तशी  अधिसूचना मंगळवारी प्रसिध्द करण्यात आली आहे. या अधिसूचनेवर २१ दिवसात सूचना हरकती नोंदवायच्या आहेत. या महामार्गामुळे सुमारे पाच हजार शेतकरी बाधित होणार आहेत. या महामार्गाला विरोधही होत आहे. संघटित विरोध करण्यासाठी दोन दिवसात बैठकीचे आयोजन करण्यात असल्याचे दिगंबर कांबळे आणि कॉ. देशमुख यांनी सांगितले.