लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महायुतीतील अंतर्गत वाद सातत्याने चव्हाट्यावर येत आहेत. खासकरून अजित पवार गट आणि भाजपा यांच्यात विसंवाद होत असल्याचं सातत्याने समोर आलंय. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट नाव घेत अनेक भाजपा नेत्यांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र लढणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. यादरम्यान, अमोल मिटकरी यांनी महायुतीतील घटकपक्षाला थेट इशारा दिला आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्तर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

येत्या काळात आणखी राजकीय वजन वाढणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता अमोल मिटकरी यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. ते म्हणाले, “राजकीय वजन वाढलं तर लोकांना त्रास होतो. त्यामुळे मला राजकीय वजन वाढण्याची अपेक्षा नाही.” तसंच, आगामी विधानसभा निवडणुकीतून अकोल्यातील किती जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस दावा ठोकणार असाही प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावर मिटकरी म्हणाले, “जिथं आमची ताकद आहे तिथे आम्ही दावा करतो. अकोला पश्चिममध्ये आमची ताकद आहे. विधानसभा महायुती एकत्र लढली तर मूर्तीजापूर मतदारसंघ आमच्याकडे परंपरांगत होताच, तर बाळापूर मतदारसंघातही आम्ही दावा करू. हे दोन मतदारसंघ हक्काचे मतदारसंघ आहेत.

हेही वाचा >> विधानसभा जागावाटपाला लोकसभा निकालाचा आधार? काँग्रेस किमान ८४ जागा लढण्याची शक्यता

दरम्यान, या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे भाजपा आणि शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे येथे उमेदवारी मिळेल का? असाही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “आमदार म्हणून माझी ही मागणी आहे. मूर्तीजापूरमध्ये चांगला चेहरा आम्हाला मिळू शकेल. तर, मागच्यावेळी बाळापूर काँग्रेसकडे होता. आम्ही विनंतीपूर्वक ती जागा सोडवली. परंतु, तिथं आम्हाला यश आलं नाही. पण शेवटच्या क्षणी जर आम्ही महायुतीतून नाही लढलो तर आमची तयारी असली पाहिजे, असंही ते पुढे म्हणाले.

५५ जागांवर आम्ही समाधानी नाही

ते पुढे म्हणाले, “महायुतीतील आणि महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष म्हणत आहेत की १००-१०० जागा लढू. म्हणजे ३०० जागा झाल्या. आणि आपल्या २८८ जागा आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येकाने तर १०० चं ताणून धरलं तर वेगळंच लढावं लागेल. आणि महायुतीत आम्हाला फक्त ५५ जागा मिळत असतील तर त्यात आम्ही समाधानी असू असं मला वाटत नाही. समाधानी राहिलंही नाही पाहिजे”, असंही म्हणत त्यांनी आगामी परिस्थितीवर भाष्य केलं आहे.

महायुतीत विसंगती नको, पावसाळी अधिवेशनादरम्यान होणार चर्चा

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या अपयशाचं खापर अजित पवारांवर फोडल्यानंतर अमोल मिटकरींनी महायुतीतील अनेक नेत्यांवर टीका केली. त्यामुळे महायुतीत वाद असल्याचं समोर आलं. यावरून महायुतीतील तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अमोल मिटकरींना संयमाने आणि समन्वयाने राहण्याचा सल्ला दिला. यावरून ते म्हणाले, “महायुतीतील दोन्हींकडून (शिंदे गट) संजय शिरसाट आणि (भाजपा) प्रवीण दरेकर यांच्यावरही लगाम लावला पाहिजे. महायुतीत विसंवाद नको, तिन्ही एकत्र आलो पाहिजे, असं सर्वांचं म्हणणं आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशनात सर्व समन्वयक एकत्र बसून ठरवतील की कोणी कोणावर बोलू नये. विसंगती होऊ नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे”, असंही ते म्हणाले.