‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून देशभरात गदारोळ सुरू झाला आहे. काहींनी या चित्रपटावर आक्षेप घेतला तर काहींनी या चित्रपटाचं समर्थन केलं आहे. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट केरळ राज्याविरोधातील प्रोपगंडा असल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाबद्दल खळबळजनक वक्तव्य केलं. चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाडांच्या या वक्तव्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यात काहीही बेकायदेशीर आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा थेट इशारा फडणवीसांनी दिला. ते अमरावती येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“चित्रपट निर्मात्याला फासावर लटकावलं पाहिजे” या जितेंद्र आव्हाडांच्या विधानाबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जितेंद्र आव्हाड जर असं बोलले असतील, तर ते अतिशय चुकीचं आहे. अशाप्रकारे बोलणं हे बेकायदेशीर आहे. प्रसिद्धी मिळवण्यासाठी आणि एका विशिष्ट समाजाचं लांगुलचालन करण्यासाठी ते अशाप्रकारे बोलतात. पण यामुळे इतर समाजात त्यांच्याबद्दल प्रचंड रोष आहे, विशेषत: हिंदू समाजात… हे जितेंद्र आव्हाडांना कळत नाही. त्याचं वक्तव्य तपासून पाहिलं जाईल, त्यांच्या वक्तव्यात काहीही बेकायदेशीर आढळलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.”
जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
‘द केरला स्टोरी’ चित्रपटातील कथेवर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या नावाखाली एका राज्याची आणि तेथील महिलांची बदनामी करण्यात आली आहे. धर्मांतर करून इसिस संघटनेत गेलेल्या महिलांचा अधिकृत आकडा तीन आहे, तरीही चित्रपटात हा आकडा ३२ हजार इतका दाखवला आहे. ज्याने या चित्रपटाची निर्मिती केली आहे, त्याला सार्वजनिकरित्या फासावर लटकवलं पाहिजे.”