Akshay Shinde Encounter Case Bombay High Court Hearing : बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. हे एन्काउंटर आता वादग्रस्त ठरले असून कोर्टानेही यावरून ताशेरे ओढले आहेत. एन्काउंटरचा संपूर्ण घटनाक्रमच संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एवढंच नव्हे तर हे एन्काउंटर असूच शकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलं आहे. याप्रकरणी आज सुनावणी झाली असून आता पुढची सुनावणी पुढच्या गुरुवारी होणार आहे. या सुनावणीत जखमी पोलिसाचे वैद्यकीय अहवाल, सीसीटीव्ही फुटेज, फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आदी पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

चार पोलिसांना त्याला आवरता आलं नाही का?

“पोलीस वाहनातून आरोपीला घेऊन जात असताना चार पोलीस अधिकाऱ्यांची गरज काय होती? यासाठी अतिरिक्त माणसांचा वापर झाला असं वाटत नाही का?” असा सवाल उच्च न्यायालयाने विचारला. तसंच, “त्याने हातातून पिस्तुल खेचून घेतली तेव्हा चार पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला रोखायला हवं होतं. चार पोलिसांना तो आवरता आला नाही का?” असाही प्रश्न न्यायालयाने विचारला.

“अक्षयने तीन गोळ्या झाडल्या असं तुम्ही म्हणालात. एक गोळी पोलिसाला लागली. मग इतर दोन गोळ्या कुठे आहेत? आपण स्वसंरक्षणाकरता असा परिस्थिती पायावर किंवा हातावर गोळी मारतो. गोळी कुठे मारावी याचं प्रशिक्षण पोलिसांना दिलं जातं.” अशाही प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर सरकारी वकिलांनी सांगितलं की, पोलिसांनी विचार केला नाही, त्यांनी घटनेवर तत्काळ प्रतिक्रिया दिली.

हे एन्काउंटर असू शकत नाही

“त्याने जेव्हा हातात पिस्तुल घेऊन कोणावर रोखली तेव्हा इतर अधिकाऱ्यांनी त्याला रोखलं का नाही. तो फार स्ट्राँग माणूस नव्हता. त्यामुळे हे स्वीकारणं कठीण आहे. हे एन्काऊंटर असू शकत नाही”, असंही न्यायमूर्ती म्हणाले.

हेही वाचा >> Akshay Shinde Encounter : “अक्षयने पिस्तुल लोड कशी केली? मी १०० वेळा…”, उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी पोलीस आणि सरकारी वकिलांना सुनावलं!

त्याने यापूर्वी कधी शस्त्र वापरली आहेत का? जर त्याने पिस्तुल लोड केली असं तुम्ही म्हणत असाल तर त्याने याआधी शस्त्र वापरली असतील, असंही न्यायमूर्तींनी विचारलं. त्यावर सरकारी वकील म्हणाले, त्याने पिस्तुल लोड केली नाही. झटापटीत पिस्तुल लोड झाली होती. त्याने याआधी कधीही शस्त्रे वापरली नाहीत.

एवढा निष्काळजीपणा का?

गंभीर गुन्हा असलेल्या माणसाला घेऊन जात असताना एवढा निष्काळजीपणा का दाखवला. याबाबत नियमावली काय आहे? त्याच्या हाताला बेड्या होत्या का? असा सवालही न्यायमूर्तींनी विचारला. त्यावर सरकारी वकील वेनेगावकर म्हणाले, त्याच्या हाताला बेड्या होत्या. पण त्याने पाणी मागितलं.