राज्यातील राजकीय वातावरण तापवणाऱ्या मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील नाट्यमय घडामोडी अद्यापही सुरूच आहेत. दररोज नवनवीन माहिती व चेहरे समोर येताना दिसत आहेत. शिवाय, आर्यन खान प्रकरणावरून मोठा वाद सुरू आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यामध्ये सातत्याने वाद सुरू आहेत. दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आज नवाब मलिक यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आर्यन खानचं अपहरण करून खंडणी उकळण्याचा हा सगळा डाव असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. तर, मलिक यांच्या पत्रकारपरिषदेवर भाजपा आमदार राम कदम यांनी टीका केली आहे. तसेच, ड्रग्ज प्रकरणात दररोज पत्रकारपरिषद घेणारे, महाराष्ट्र सरकारचे मंत्री आज स्पष्टपणे बॅकफूटवर दिसले, काय कारण? असा सवाल देखील केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राम कदम म्हणाले, “ड्रग्ज प्रकरणात दररोज पत्रकारपरिषद घेणारे, महाराष्ट्र सरकारचे मंत्री आज स्पष्टपणे बॅकफूटवर दिसले, काय कारण? जेव्हा राष्ट्रवादी नेते सुनील पाटील हे प्रकरणात सूत्रधार असुन, त्यांचा माणूस किरण गोसावी त्याच्याद्वारे शाहरुख खानकडून २५ कोटी रुपयांची वसुली करत होते. हे जेव्हा समोर आलं आणि मग या वसुलीचे वाटेकरी कोण? नेते कोण? मंत्री कोण? हे सगळं पुढे आलं तर पंचायत होईल. यामुळे ते बॅकफूटवर होते का? नेमकं कारण काय? एनसीबीला बदनाम केलं. काही कारण नसताना भाजपालाही ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र आज स्पष्टपणे पत्रकारपरिषदेत म्हणत होते, की यामध्ये भाजपाचा काही संबंध नाही. देशाच्या समोर स्पष्टपणे आलं आहे, की या ड्रग्ज प्रकरणाचा प्रमुख सुत्रधार हा राष्ट्रवादीचा नेता आहे. जर हिंमत असेल, तर महाराष्ट्र सरकारने स्वत: या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी करावी. राष्ट्रवादीचा नेता सुनील पाटील पासून किरण गोसावी आणि जे आवश्यक असतील त्यांची नार्को टेस्ट करावी. तुम्ही काही केलं नाही ना, तर मग भीती कसली? होऊन जाऊ द्या दूध का दूध पाणी का पाणी.”

“खंडणीसाठीच आर्यन खानचं अपहरण केलं”, नवाब मलिक यांचा खळबळजनक आरोप!

आर्यन खानला २ ऑक्टोबरच्या दिवशी क्रूजवर बोलावण्यात आलं होतं, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. “प्रतीक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांच्या माध्यमातून आर्यन खान क्रूजवर गेला. मोहीत कंबोज यांच्या साल्याच्या माध्यमातून हे जाळं टाकण्यात आलं. तिथे आर्यन खानला पोहोचवलं गेलं. आर्यन खानचं अपहरण करून २५ कोटींची खंडणी मागण्याचा खेळ सुरू झाला. याची डील १८ कोटींमध्ये झाली. ५० लाख रुपये उचलले देखील गेले होते. पण एका सेल्फीने खेळ बिघडवला”, असं नवाब मलिक म्हणाले आहे. के. पी. गोसावीचा आर्यन खानसोबतचा सेल्फी व्हायरल झाला होता.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Those who hold daily press conferences are clearly seen on the backfoot today ram kadams target on nawab malik msr