धाराशिव : Maharashtra ST Employee Strike राज्य परिवहन मार्ग महामंडळाच्या धाराशिव विभागातील  कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा संपाचे हत्त्यार उपसले आहे. सर्वसामान्यांच्या जीवनात अनन्य साधारण महत्व असलेल्या ग्रामीण भागातील वाहिनीची चाके कामगारांच्या संपात रूतल्याने सामान्यांसह आगारांचेही लाखो रूपयांचे बुडाले आहे. जिल्ह्यातील सहा आगारांतून दररोज सव्वा सहाशेवर बसगाड्यांच्या नियोजित फेर्‍या रद्द झाल्याने पहिल्याच दिवशी २२ लाख रूपयांचा फटका महामंडळाला बसला आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यस्तरीय कामगार संघटनेच्या कार्यकारिणीची १४ ऑगस्ट रोजी बैठक घेवून कामगारांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारला २७ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. त्यानंतर २८ ऑगस्ट रोजी कामगारांच्या जिल्हास्तरीय कार्यकारिणीने निदर्शने करून ३ सप्टेंबरपासून एसटी महामंडळ कामगार संपावर जाणार असल्याचा इशारा दिला होता. तरीही राज्य सरकारकडून कामगारांच्या मागण्यांची दखल घेण्यात न आल्याने त्याचा विपरीत परिणाम एसटी महामंडळाच्या दैनंदिन कामावर झाला. शुक्रवारी चालक, वाहक व अन्य कामगार कामावर आले नाहीत. त्यामुळे बस आगाराच्या बाहेर आली नाही.

हेही वाचा >>> Ladki Bahin Yojana Scam : ३० आधार कार्ड, ३० अर्ज अन् एक मोबाईल क्रमांक; लाडकी बहीण योजनेतील धक्कादायक गैरप्रकार उघड

धाराशिव जिल्ह्यात धाराशिव, उमरगा, भूम, तुळजापूर, कळंब व परंडा हे सहा आगार आहेत. धाराशिव आगारातून दररोज १२० नियोजित फेर्‍या होेतात. पैकी मंगळवारी सकाळी १७ फेर्‍या झाल्या. त्यानंतर चालक, वाहक संपात सहभागी झाले. उमरगा आगाराच्या ११७ नियोजित फेर्‍या होत्या. पैकी दोनच गाड्या धावल्या. भूम आगाराच्या १०० नियोजित फेर्‍यांपैकी केवळ चारच फेर्‍या झाल्या. तुळजापूर आगारातून ९५ नियोजित फेर्‍यांपैकी २१ फेर्‍या, कळंब आगाराच्या १५८ नियोजित फेर्‍यांपैकी ६६ तर परंडा आगारातून दररोज धावणार्‍या ४४ नियोजित बसगाड्यांच्या फेर्‍यांपैकी केवळ १२ फेर्‍या झाल्या. कामगारांच्या संपाचा धाराशिव विभागावर चांगलाच परिणाम झाला असून एकूण ६३४ नियोजित फेर्‍यांपैकी केवळ १२२ फेर्‍या झाल्या तर ५१२ फेर्‍या रद्द झाल्या. दररोज ६३४ गाड्यांचे ९८ हजार ६८६ किलोमीटर होते. पैकी ८१ हजार ५०० किलोमीटरच्या फेर्‍या रद्द झाल्या आहेत. यामुळे सहाही आगाराचे एकूण २२ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे.

हेही वाचा >>> छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण; शिल्पकार जयदीप आपटे विरोधात लुकआऊट नोटीस जारी

आगारनिहाय रद्द झालेल्या फेर्‍या व बुडालेले उत्पन्न धाराशिव आगारातून १०३ फेर्‍या रद्द झाल्या बसफेर्‍यांतून मिळणारे पाच लाख ४८ हजारांचे संभाव्य उत्पन्न बुडाले आहे. उमरगा आगाराच्या ११५ फेर्‍या रद्द झाल्याने दोन लाख १९ हजारांचे उत्पन्न बुडाले, भूम आगाराच्या ९६ फेर्‍या रद्द झाल्याने दोन लाख ७८ हजारांचे उत्पन्न बुडाले, तुळजापूर आगारातून ७४ फेर्‍या रद्द झाल्या असून सहा हजार ७७ हजार रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे, कळंब आगारातून ६६ फेर्‍या रद्द झाल्या असून कळंब आगाराला सव्वा तीन लाखाचा फटका बसला आहे. परंडा आगारातून पहिल्या दिवशी ३२ फेर्‍या रद्द झाल्या असून दीड लाख रूपयांचे उत्पन्न बुडाले आहे. एकंदरीत धाराशिव विभागातून पहिल्या दिवशी ५१२ बसफेर्‍या कामगारांच्या संपामुळे रद्द झाल्यामुळे एकूण २२ लाखांचे उत्पन्न बुडाले आहे.