लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ आज(सोमवार) महाविका आघाडीकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. या बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. तर, भाजपाने मात्र या बंद वरून महाविकासआघाडीवर जोरदार टीका केली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधण्यात आला, तर भाजपा नेत्यांच्या टीकेला महाविकासआघाडीच्या नेत्यांनी देखील प्रत्युत्तर दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकीकडे दिवसभर हे आरोप-प्रत्यारोप सुरू होते. तर, दुसरीकडे हा बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी लोकांनी स्वतःहून बंद पाळला, तर काही ठिकाणी वादाच्या घटना देखील घडल्या. दरम्यान, ठाण्यामध्ये शिवसैनिकांकडून रिक्षा चालकांना मारहाण देखील झाली व बंद पाळण्यासाठी दमदाटी करण्यात आल्याचे समोर आले. या सर्व घडामोडींवर व बंद बाबत शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आजचा महाराष्ट्र बंद १०० टक्के यशस्वी झाला, असं त्यांनी सांगितलं. याचबरोबर वादाच्या घटनांवर बोलताना त्यांनी ”शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान करणाऱ्यांवर जर हात जोडणाऱ्यांचा हात सुटला असेल, तर ते आंदोलन आहे. जसं आपलं एक गाणं आहे प्यार मे कभी कभी ऐसा होता है…. तसंच बंद मै कभी कभी ऐसा हो जाता है…” असं देखील बोलून दाखवलं.

“बंद मोडून काढण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी…”; संजय राऊत यांचं भाजपाला थेट आव्हान

“आजचा महाराष्ट्र बंद शंभर टक्के यशस्वी झाला. आपण पाहिलं असेल मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदचा प्रभाव जबरदस्त होता. लोक स्वत:हून बंद मध्ये सहभागी झाले होते. अर्थात काही ठिकाणी काही लोक बाहेर पडले, पडण्याचा प्रयत्न झाला. त्यांना थांबवलं. आंदोलनात असं होतं नेहमी, बंद आहे तुम्ही जाऊ नका. बाचाबाची होते, वाद होतात. होत असतात ना, असे बंद यापूर्वी अनेकांनी केले आहेत. भाजपाने बंद केले नाही का पूर्वी? या पद्धतीनेच केले जातात. काही लोक असे असतात नतदृष्ट, की त्यांना हा बंद कशासाठी पुकारला, हे समजत नाही. हा बंद काही राजकीय बंद नव्हता. राजकीय स्वार्थासाठी बंद नव्हता. एखाद्या पक्षाला फायदा व्हावा म्हणून हा बंद नव्हता. ” असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

महाराष्ट्र बंद : ठाण्यामध्ये शिवसैनिक आक्रमक, रिक्षाचालकांना मारहाण!

“उत्तर प्रदेशमध्ये जिथे भाजपाचं राज्य आहे, केंद्रामध्ये भाजपाचं राज्य आहे. ज्याप्रकारे शेतकऱ्यांना चिरडलं गेलं, मारलं गेलं, त्यांची हत्या केली गेली. आक्रोश शेतकऱ्यांचा जो आहे तो देशापर्यंत पोहचला आहे, पण सरकार एखाद्या मूकबधिरासारखं बसलेलं आहे. आरोपींना पाठीशी घालत आहेत. गुन्हेगारांना पकडलं जात नाही. उलट शेतकऱ्यांनाच दहशतवादी, खलिस्तानी ठरवलं जातं. या विरोधात एक रोष व्यक्त झाला आहे आणि तो रोष व्यक्त करण्याचं काम महाराष्ट्राच्या या बंदने केलं आहे. ” असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र बंद : “ शेतकऱ्यांच्या हत्याऱ्यांना हा ढोंगीपणाच वाटणार ” ; नाना पटोलेंचा फडणवीसांवर पलटवार!

तसेच, “महाराष्ट्राचा जो बंद आहे, यामध्ये काय राजकारण आहे? तीन पक्ष एकत्र आले महाविकास आघाडीमधील त्याला इतर पक्षांनी पाठिंबा दिला, त्यांनी बंद पुकारला. आता तुम्ही म्हणतात हा राज्य पुरस्कृत… म्हणजे काय असतं ते राज्य पुरस्कृत? तुम्ही जर म्हणत असाल की आजचा बंद हा राज्य पुरस्कृत आहे. मग उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी भागात शेतकऱ्यांच्या ज्या निर्घृण हत्या झाल्या. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाने अत्यंत बेदरकरापणे, बेफामपणे, बेबंदपणे, अमानुषपणे शेतकऱ्यांना आपल्या गाडीखाली चिरडलं. मग तो अतिरेक देखील राज्य पुरस्कृत होता का? सरकारचा पाठिंबा होता का? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या पाठिंब्याने या हत्या झाल्या, की पंतप्रधानांच्या पाठिंब्याने हत्या झाल्या? हा प्रश्न आहे, आम्ही असं म्हणणार नाही. पंतप्रधान किंवा मुख्यमंत्र्यांचा या लखीमपूर खेरी घटनेशी संबंध नाही, ते घडलं आहे. कुणीतरी बेदरकारपणे ते केलेलं आहे. सरकारनं किंवा कायद्याने त्याचं काम करावं. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले, आम्ही बंद पुकारला. शेतकऱ्यांचा आवाज आम्ही देशापर्यंत पोहचवला. यातून जर काही केंद्र सरकारला बोध घेता आला तर घ्यावा, एवढच आमचं म्हणणं आहे.” असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

“ गोवारी हत्याकांड, मावळ गोळीबार, पालघर साधू हत्याकांड झालं त्यावेळेस कुठं होतं सरकार? ” ; दरेकरांचा सवाल!

याचबरोबर, “तुम्ही एखाद्या राजकीय पक्षाच्या चिथावणीला बळी पडून बाहेर पडत असाल, आणि त्या अन्नदात्या शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान करत असाल. त्याने सांडलेल्या रक्ताचा अपमान करत असाल, अरे तो अन्नदाताच जगला नाही तर तुम्ही जगाल का? त्याच्यासाठी तुम्ही पाच-सहा तास थांबू शकत नाही शांतपणे? आंदरांजली आहे त्यांना ही, श्रद्धांजली आहे. हा बंद पुकारून त्या मृत शेतकऱ्यांना आपण आदरांजली वाहत होतो. तुम्ही त्यांचा अपमान करता, अशावेळी अपमान करणाऱ्यांवर जर हात जोडणाऱ्यांचा हात जर सुटला असेल, तर ते आंदोलन आहे. जसं आपलं एक गाणं आहे प्यार मे कभी कभी ऐसा होता है…. तसंच बंद मै कभी कभी ऐसा हो जाता है…”असं देखील संजय राऊत शेवटी म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Todays maharashtra bandh was one hundred percent successful sanjay raut msr
Show comments