लोकसत्ता वार्ताहर
नांदेड : उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत असल्याने आज नांदेडसह अर्धापूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले. सहा महिन्यांपूर्वी टोमॅटो २०० रुपये किलो दराने विकले जात होते. त्यावेळी सरकारने अन्य देशातून टोमॅटोची आयात केली. याच काळात शेतकऱ्यांनी लागवड केल्याने नांदेड शहर, अर्धापूर, भोकर तसेच अन्य काही तालुक्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड केली होती. घाऊक बाजारात पाच रुपये किलो एवढा दर गडगडला आहे.
लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी टोमॅटोचे उत्पादन घेतले खरे, पण आवक जास्त आणि मागणी कमी झाल्याने टोमॅटोचे दर कोसळले. उत्पादन खर्चही न निघाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शनिवारी अनेक ठिकाणी रस्त्यावर टोमॅटो टाकून पायदळी तुडविले. अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील शेतकऱ्यांनी आज आंदोलन करत शासनाकडून मदतीची मागणी केली आहे. टोमॅटोसह अन्य पिकांचे दर घसरल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कधी अतिवृष्टी, कधी गारपीट तर कधी दुष्काळ अशा नैसर्गिक चक्रव्यूहात अडकलेल्या शेतकऱ्यांना मदतीची नितांत गरज आहे. भाजीपाल्यासह हळद, सोयाबीन या पिकांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
माझ्याकडे दीड एकर टोमॅटो लागवड झालेली होती. त्यात आजपर्यंत एकूण दोन लक्ष रुपये खर्च झाला आहे. बाजारात ४० कॅरेट टोमॅटो विक्रीस नेले असता ५५ रुपये प्रति कॅरेट खर्च आला आहे. त्यामुळे प्रति कॅरेट १५ रुपये खर्च अंगावर आला आहे. टोमॅटो विक्रीतून ६०० रुपयांचे नुकसान झाले. -गजानन पाटील कदम कोंडेकर, कोंढा, ता अर्धापूर, जिल्हा नांदेड