रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने याचा फटका जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला चांगलाच बसला आहे. बहुतांश ठिकाणी पर्यटकांची संख्या कमी झाल्याने येथील उद्योग व्यवसाय देखील संकटात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
देश विदेशातील पर्यटकांना कोकणातील पर्यटन स्थळांचे आकर्षणाने चांगलीच भुरळ घातली असताना येथील तापमान वाढीचा फटका आता कोकणातील पर्यटन स्थळांना बसला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरीतील गणपतीपूळे, दापोली, गुहागर यासारख्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी बघायला मिळते.
अनेक पर्यटक जिल्ह्यात येत असल्याने येथील व्यावसाय वाढीमध्ये भर पडलेली दिसून येते. मात्र जिल्ह्यातील तापमान वाढीचा फटका येथील व्यावसायाना बसू लागला आहे. तसेच पर्यटकांची संख्या रोडावल्याने जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळांच्या ठिकाणी शुकशुकाट बघायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेली सलग दोन दिवस उष्णतेचा पारा ३८ ते ४० अंशावर गेल्याने पर्यटकांसह व सर्वसामान्य लोकांना देखील घराबाहेर पडणे मुश्किल झाले आहे.
जिल्ह्यातील दापोली, गुहागर याबरोबर रत्नागिरीतील गणपतीपुळे मंदिर परिसर व समुद्र चौपाटी परिसरात पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. तसेच वाढत्या उष्णतेमुळे थंडाव्यासाठी जिल्ह्यात शीतपेयांची मागणी वाढली असून, कलिंगड, सरबत विक्रेते व थंडपेये दुकानांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याची दिसून येत आहे.
जिल्ह्यात अशा प्रकारे उष्णता वाढत असल्याने पर्यटनस्थळांच्या ठिकाणी येणारे पर्यटक कमी झाल्यास येथील अनेक व्यवसायिकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आहे. गणपतीपुळे येथील पर्यटकांची संख्या कमी होत जात आहे. यामुळे आमच्या व्यावसायावर फरक पडलेला दिसत आहे. व्यावसायावर मंदीचे सावट पसरल्यासारखे चित्र निर्माण झाले आहे.
वाढत्या उष्णतेमूळे आणि दहावी बारावीच्या सुरु असलेल्या परीक्षांमुळे पर्यटक कमी झाले आहेत.- सचिन मालगुंडकर, गणपतीपुळे