सांगली : कोणत्याही शक्तिप्रदर्शनाविना शुक्रवारी सांगलीत विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. सांगली, मिरजसह राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघातही तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्यासह दोघांनी निवडणूक लढविण्याची तयारी दर्शवली. तर मिरजेत काल आलेल्यांना जर पक्षाने उमेदवारी देऊन निष्ठावंतावर अन्याय केल्यास बंडखोरीचा इशारा दिला.

सोलापूरच्या खासदार शिंदे यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. या वेळी इच्छुकांना पक्षासाठी तुमचे योगदान काय, पक्षाने तुम्हाला वगळून जर उमेदवार अन्य कोणाला दिल्यास तुमची भूमिका पक्षनिष्ठ म्हणून काय असेल असे मोजकेच प्रश्न विचारले. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार विशाल पाटील उपस्थित होते. तत्पुर्वी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी खासदार शिंदे यांचे स्वागत केले. सांगली मतदारसंघातून जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आपणालाच उमेदवारी मिळावी, अशी मागणी केली.

हेही वाचा – आमदार भरत गोगावले यांच्यावर गुन्हा दाखल करा, शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महिला आघाडीची मागणी

तथापि, मिरज राखीव मतदारसंघातून नऊ जणांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. भाजपमधून नुकतेच आलेले प्रा. मोहन वनखंडे, उद्योगपती सी. आर. सांगलीकर, नंदा कोलप, रवींद्र कोलप, धनराज सातपुते, अरूण धोत्रे, संजय कांबळे आदींनी उमेदवारीची मागणी केली असून निरीक्षकासमोर आपलाच उमेदवारीवर हक्क असल्याचे सांगितले. तथापि, प्रा. वनखंडे यांनी पक्षासाठी काहीही योगदान दिलेले नाही. यामुळे त्यांना जर पक्षाने उमेदवारी दिली तर मान्य केली जाणार नाही, प्रसंगी बंडखोरी करू, असा इशारा सांगलीकर यांनी दिला. या निर्णयाला अन्य आठ इच्छुकांचे अनुमोदन असल्याचेही सांगलीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा – Video: सरसंघचालक मोहन भागवतांचं हिंदूंना आवाहन; म्हणाले, “तुमच्या लक्षात यायला हवं की…”

दरम्यान, काँग्रेसचे वाळवा तालुकाध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाटील यांनीही आपण मुलाखत दिली असून, पक्षाने संधी दिली तर निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचे सांगितले. तसेच याच मतदारसंघातून पक्षाच्या महिला पदाधिकारी मनीषा रोटे यांनीही उमेदवारीची मागणी केली आहे. शिराळ्यातून रवि पाटील, जतमधून आमदार विक्रमसिंह सावंत, तुकाराम माळी, खानापूर-आटपाडीमधून रविकांत भगत, गजानन सुतार आदींनी मुलाखती दिल्या.