रत्नागिरी : तालुक्यातील आरे वारे समुद्राच्या पाण्यात पनवेल येथील शनिवारी दोघेजण बुडाले. यातील एकाला वाचवण्यात यश आले असून सिद्धार्थ विनायक फासे (वय १९) या तरुणाचा यात मृत्यू झाला. तर प्रविंद्र बिरादार याला वाचविण्यात स्थानिकांसह जिवरक्षकांना यश आले आहे. शनिवारी दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

रत्नागिरीच्या कोषागार कार्यालयात काही वर्षांपुर्वी कार्यरत असलेले व सध्या वसई-विरार महानगरपालिकेचे मुख्य लेखा परिक्षक विनायक फासे हे १५ ऑगस्टला आपल्या कुटुंबासह फिरण्यासाठी रत्नागिरीत आले होते. शनिवारी दुपारी ते कुटुंबासमवेत आरे-वारे येथील समुद्र किनारी गेले होते. समुद्र किना-यावर फिरत असताना त्यांच्या मुलगा सिद्धार्थ हा गुडघाभर पाण्यात उतरला.

आणखी वाचा-भास्कर जाधव मुलासाठी मतदारसंघ बदलणार? पराभवाचा डाग पुसण्यासाठी आता…

अशातच अचानक आलेल्या एका लाटेमुळे सिद्धार्थ पाण्यात ओढला गेले. प्रविंद्र बिरादार यांनी त्याला वाचविण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सिद्धार्थ आत ओढला गेला. सिद्धार्थला वाचविताना प्रविंद्र बिरादार यांच्या श्वास गुदमरु लागल्याने ते पाण्यात कोसळले. यावेळी नातेवाईकांनी आरडाओरड केल्यानंतर स्थानिकांसह जीवरक्षक घटनास्थळी धावले. त्यांनी सर्व प्रथम प्रविंद्र बिरादार यांना पाण्याच्या बाहेर काढले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. मात्र पाण्याच्या प्रवाहात आत ओढला गेलेल्या सिद्धार्थचा मृत्यू झाला. त्याला जिवरक्षकांनी पाण्यातून बाहेर काढत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र तो मृत झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

या घटनेचे वृत समजताच पोलीस निरिक्षक नितिन ढेरे, पोलीस उपनिरिक्षक सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक संजय शिगवण यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात येऊन पंचनामा केला. शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.