नगर सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील माहीजळगाव बायपास जवळ भीषण अपघात यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला असून एकाचा जागेवरच तर दुसरा मिरजगाव येथील लोकमान्य हॉस्पिटल उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे. सोमनाथ दत्तात्रय कदम (वय २४) व शिवाजी बबन कदम (वय ३५) दोघेही राहणार कोकरवाडी तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथील आहेत.

याबाबत घडलेली घटना अशी की आज दिनांक 22 ऑक्टोबर रोजी सोमनाथ कदम व शिवाजी कदम हे दोघे काही कामानिमित्त कोकरवाडी तालुका परंडा येथून करमाळा मार्गाने हिरो होंडा स्प्लेंडर या क्रमांक एम एच ४५ आर ९७१८ या दुचाकीवरून मिरजगावच्या दिशेने येत असताना व अज्ञात वाहन मिरजगाव कडून करमाळ्याच्या दिशेने जात असताना नगर सोलापूर महामार्गावर माहीजळगाव बायपास जवळ दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास समोरासमोर जोराची धडक होऊन सोमनाथ दत्तात्रय कदम याचा जागीच मृत्यू झाला तर शिवाजी बबन कदम याचा मिरजगाव येथील लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले आहे. शिवाजी भगवान कदम हा विवाहित असून पत्नी व लहान दोन मुले असा परिवार आहे.

हेही वाचा… Diary oF Home Minister : “माझ्यावर दबाव टाकून मविआ सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला”, अनिल देशमुखांच्या पुस्तकाची चर्चा!

अपघाताची माहिती मिळताच मिरजगाव येथील जीवन ज्योत रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्तांना मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले तर शिवाजी कदम यांचा श्वास चालू असल्यामुळे त्यांना लोकमान्य हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल केले होते परंतु त्याची ही प्राणज्योत मालवल्यानंतर शिवछेदनासाठी मिरजगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन आले. अपघाताची फिर्याद अपघातग्रस्त मयताचे नातेवाईक अशोक मधुकर लोखंडे राहणार मुर्शिदपूर तालुका आष्टी जिल्हा बीड यांनी दिली असून पुढील तपास कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे व मिरजगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार दत्तात्रय कासार हे करत आहेत.