Vedanta Foxconn project : वेदांता-फॉक्सकॉन कंपनीने महाराष्ट्रात होणारा प्रकल्प गुजरातमध्ये हलवल्यानंतर शिंदे सरकारवर जोरदार टीका होते आहे. दरम्यान, संदर्भात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच राज्यातून एक कंपनी गेली असली तरी त्यापेक्षा तिप्पट गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याची ताकत असल्याचेही ते म्हणाले.
वेंदाता संदर्भात काय म्हणाले उदय सामंत?
“वेदांता-फॉक्सकॉन कंपनी ही आजच महाराष्ट्रात येणार नव्हती. यासंदर्भात महाराष्ट्र शासनाकडून गेल्या एक वर्षापासून पाठपुरावा होत होता. उद्योगमंत्री होऊन मला १५ दिवस झाले असताना आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर पूर्वीच्या इंन्सेंटीव्हपेक्षा जास्त इंन्सेंटीव्ह आम्ही देणार होतो. तरीही ती कंपनी गुजरातला का गेली, याबाबत माहिती घेऊन बोलणे योग्य ठरेन, आता यावर बोलणं योग्य नाही”, अशी प्रतिक्रिया उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
हेही वाचा – दसरा मेळाव्याच्या राजकारणावरून धनंजय मुंडेंचा शिंदे सरकारला टोला; म्हणाले, “हे सरकार…!”
“एक कंपनी गुजरातला गेली याचा अर्थ आपल्याकडे कंपन्याच येत नाही किंवा यापुढे येणार नाही, असा होत नाही. आजच मी जर्मनीच्या काही लोकांशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी खाद्य आणि शेतीमध्ये गुंतवणूक करायची असल्याचे त्यांनी मला सांगितले. गेल्या काही दिवसांपासून आम्ही विविध कंपन्याशी चर्चा करत आहोत. येत्या काळात राज्यात मरीनपार्क, लॉजिस्टीक पार्क असे अनेक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातून एखादी कंपनी गेली, म्हणजे राज्यातल्या सर्व कंपन्या जात आहे, असे होत नाही. तसेच जेवढी गुंतवणूक महाराष्ट्रातून गेली आहे, त्यापेक्षा तिप्पट गुंतवणूक राज्यात आणायचं ताकद आमच्या सरकारमध्ये आहे”, असेही ते म्हणाले.