आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य तसेच देशातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टोकाचे आरोप-प्रत्यारोप करतायत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (३ मार्च) एका सभेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी देशासह राज्यात सत्ताधारी भाजपाविरोधात असंतोष आहे. भाजपाने यावेळी ईव्हीएममध्ये घोटाळा करून दाखवावाच. तसं केलं तर देशात असंतोषाची लाट येईल. देशातील हुकूमशाहीविरोधात आम्ही एकत्र आलो आहोत, असं ठाकरे म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुम्ही ईव्हीएम घोटाळा करूनच बघा”

“आज शेतकरी, कामगार, विद्यार्थी आक्रोश करत आहेत. पण ईव्हीएममध्ये काय होणार? अशी भीती सर्वांनाच आहे. लोकांमध्ये सरकारविरोधात उघड रोष दिसतो. या वेळेला त्यांनी ईव्हीएममध्ये घोटाळा करण्याचा प्रयत्न केला तर असंतोषाचा भडका उडाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही ईव्हीएम घोटाळा करूनच बघा,” असं आव्हान ठाकरेंनी भाजपाला दिलं.

“दुष्काळात तेरावा महिना म्हणून हे घटनाबाह्य सरकार आलं”

“देशभर लोकांमध्ये आक्रोश आहे. मी लोकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये जातो. पण ग्रामीण भागात माझ्या सभांना सगळे शेतकरीच असतात. मी या शेतकऱ्यांना प्रश्न विचारतो की मी मुख्यमंत्री असताना केलेली कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नाही? हो कर्जमुक्ती मिळाली होती, असं सगळे ओरडून सागंतात. आता मात्र दुष्काळात तेरावा महिना म्हणून हे घटनाबाह्य सरकार आलं आहे. कर्जमाफी सोडून द्या, महाराष्ट्रावर पुन्हा कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे,” असा दावा उद्धव ठाकरेंनी केला.

“अल्लाहुद्दीनचा जादूचा दिवा…”

“मला आश्चर्य वाटतं की काही सुशिक्षित लोक विचारतात की विरोधकांकडे पर्याय कोण आहे. मी त्यांना म्हणतो की हा प्रश्न तुम्ही भाजपाला विचारा. भाजपाकडे पर्याय कोण आहे. एकच प्रोडक्ट किती वेळा लॉन्च करणार. तेच प्रोडक्ट किती वेळा घासणार. कारण याआधीच्या दोन निवडणुकांत भाजपाचं तेच प्रोडक्ट होतं. हे प्रोडक्ट म्हणजे अल्लाहुद्दीनचा जादूचा दिवा आहे आणि तो दिवा घासला की स्वप्न साकार होईल, असं भाजपाला वाटतं. पण या दिव्यातून थांपाशिवाय दुसरं काही बाहेरच पडत नाही,” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“हुकूमशाहीला एकच पर्याय असतो तो म्हणजे…”

भाजपाकडे मोदींशिवाय पर्याय आहे का. आम्ही सगळे मोदींविरोधात नव्हे तर हुकूमशाहीविरोधात एकत्र आलो आहोत. आम्हाला या देशात हुकूममशाहा नको आहे. हुकूमशाहीला एकच पर्याय असतो तो म्हणजे लोकशाही. आम्हाला देशातली लोकशाही टिकवायची आहे. आम्ही विचारांनी थोडेफार वेगळे असलो तरी देशभक्त म्हणून आम्ही एकत्र आलो आहोत, असेही ठाकरेंनी स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray criticizes narendra modi bjp over evm and upcoming loksabha election 2024 prd
Show comments