लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागला. या निवडणुकीत महायुतीला अवघ्या १७ जागा जिंकता आल्या. त्यातल्या ९ जागाच भाजपाच्या वाट्याल्या आहेत. २०१९ ला २३ खासदार जिंकवणू आणणारा पक्ष ९ जागांवर आला. उत्तर प्रदेशातही भाजपाला फटका बसला. हे सगळं झालं असलं तरीही एनडीएने सरकार स्थापन केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधीही पार पडला. आता देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत उद्धव ठाकरेंना झालेलं मतदान मराठी माणसाचं नव्हतं असं म्हटलंय.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

“महाराष्ट्रातही पॉलिटिकल अर्थमॅटिक आपल्या विरोधात गेलं हे खरं आहे. पण मतांमध्ये कुठेही कमतरता पडली नाही. आपल्या ४३.६ टक्के त्यांना ४३.९ टक्के आहे. .३० इतकाच फरक आहे. त्यामुळे त्यांना विजय मिळाल्याचा आभास तयार करता आला. भाजपाच्या १३ जागा अशा आहेत ज्या चार टक्केंपेक्षा कमी मतांनी आपण हरलो आहोत. जे जिंकले त्यांना शुभेच्छा आहे. आता आपल्याला जे मिळालंय ते पुढे घेऊन जाऊ. ज्या पक्षाला एकेकाळी दोन खासदारांवरुन हिणवलं होतं त्या पक्षाच्या नेत्यांनी रेकॉर्ड केला आणि पंडीत नेहरुंच्या नंतर तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी आहेत. कधी कधी मेरिटमध्ये पास होणारा मुलगा डिस्टिंक्शनमध्ये ७५ टक्के मिळाले तरीही लोकांना वाटतं मेरिटचा मुलगा होता. तर जो ३५ टक्के मार्क मिळवतो त्याला ४० टक्के मिळाले तर लोक त्याची हत्तीवरुन वरात काढत आहेत. संपूर्ण इंडिया आघाडी मिळून जेवढ्या जागा मिळाल्या त्याहून जास्त जागा भाजपाला मिळाल्या. आपली लढाई फेक नरेटिव्हशी होती. ज्या ठिकाणी आपण कमी पडलो त्या ठिकाणी त्या ठिकाणी इंडिया आघाडीशी हरलो नाही, फेक नरेटिव्हमुळे कमी पडलो आहे. देशातल्या ७६ जागा अशा आहेत जिथे कमी फरकाने आपण पडलो. संविधान बदलणार या खोट्या प्रचारामुळे या गोष्टी घडल्या.” असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेवर भगवा फडकविणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आत्मविश्वास

फेक नरेटिव्ह वारंवार जिंकत नाही

“फेक नरेटिव्ह फॅक्टरीला सोशल मीडियावर आपण तेवढ्या ताकदीने उत्तर देऊ शकलो नाही किंवा डॅमेज इतकं होतं आहे हे लक्षात आलं नाही. त्यामुळे कमी फरकाने आपण देशात ७६ सीट हरलो. काही लोक डमरु वाजवत आहेत, काही लोक छाती बडवत आहेत, त्या सगळ्यांना मी सांगतो फेक नरेटिव्ह एकदा चालतो तो वारंवार चालत नाही. आम्ही पुन्हा येऊ. असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात आपण डाऊन झालो आहोत पण आऊट नाही हे लक्षात घ्या. पूर्ण ताकदीने विधानसभा जिंकणार आहोत. विधानसभेत आपण जास्त जागा जिंकू आणि महापालिका निवडणूक कधीही येऊद्या कधीही महानगरपालिकेवर आपला भगवा फडकणारच. असा निर्धारही देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

चार महिने ज्यांचे पाय धरले त्यांचीच मतं उद्धव ठाकरेंना

“मुंबईत लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या चार जागा कुठून आल्या हे नीट पाहिलं तर लक्षात येईल की सामान्य मुंबईकर आणि मराठी माणसांनी त्यांना मतदान केलेलं नाही. मुंबईत असलेल्या, चार पिढ्या मुंबईकर असलेल्या उत्तर भारतीयांनी मतदान केलेलं नाही. त्यांना नेमकं कुठून मतदान मिळालं तर लक्षात येईल की मागचे चार महिने ज्यांचे पाय ते पकडत होते, ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदू बांधवांनो भगिनींनो म्हणलं सोडलं होतं. तसंच ज्यांच्यासाठी त्यांनी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणणं सोडून जनाब बाळासाहेब ठाकरे केलं होतं. केवळ त्यांच्याच मतांवर त्यांनी अर्थमॅटिक जिंकलं आहे. असं फडणवीस म्हणाले.