हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालावरून गौतम अदाणी व त्यांचा अदाणी उद्योग समूह अडचणीत आला होता. समभागांच्या विक्रीमध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप हिंडेनबर्गनं ठेवला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची विशेष तपास यंत्रणेकडून चौकशी करण्याची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे अदाणींबाबत सेबीकडूनच योग्य तो तपास होणार, असं न्यायालयाने स्पष्ट केलं. या पार्श्वभूमीवर एकीकडे अदाणींनी सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली असताना दुसरीकडे विरोधकांनी त्यावरून मोदी सरकारला व भाजपाला लक्ष्य केलं आहे. ठाकरे गटानं यासंदर्भात टीका करताना राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर टीकास्र सोडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“अलिकडे अदाणींच्या बाबतीतच सत्याचा विजय होतो”

“अदाणींच्या बाबतीतच अलीकडे सत्याचा विजय होतो व इतरांच्या बाबतीत सत्य भूमिगत होते, हे असे का व्हावे? देशातील सार्वजनिक उपक्रम, जंगले, जमिनी अदाणी यांना देण्यात आल्या. इलेक्शन कमिशन, केंद्रीय तपास यंत्रणांचेही एकप्रकारे खासगीकरण झाल्याने मोदी-शहा ज्यांच्याकडे बोट दाखवतील त्यांना अपराधी ठरवून तुरुंगात डांबले जाते; पण अदाणी यांच्या बाबतीत व्यवहारांचा इतका गदारोळ उठूनही सर्व यंत्रणा डोळेझाक करून बसल्या”, असा आरोप सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

“अदाणी हेच भाजपा”

“अदाणींवर आरोप होतात तेव्हा भाजपाचा जीव कासावीस होतो. यामागचे अर्थकारण लपून राहिलेले नाही. महाराष्ट्रात ज्यांच्याविरुद्ध ईडी-इन्कम टॅक्सच्या चौकशांचा फेरा सुरू होता, ते भाजपात जाताच तो चौकशीचा फेरा थांबला आहे. अदाणी हेच भाजप असल्याने त्यांच्याविरुद्ध चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यांच्या चौकशीची मागणी करणाऱ्यांनाच वधस्तंभावर चढवले जाईल”, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’कडून मोदी यांच्या कारकीर्दीची प्रशंसा; भारताची आर्थिक, सामाजिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांत प्रगती

“महाराष्ट्रात एक घटनाबाह्य सरकार दीड वर्षांपासून चालवले जाते. या सरकारने भांडवलदारांची तळी उचलून मुंबई अदाणी यांच्या घशात घालण्याचा डाव रचला आहे. शिवसेना व उद्धव ठाकरे सत्तेवर असते तर ते घडू दिले नसते. म्हणून अदाणी यांनी पैशाचा वापर करून महाराष्ट्राचे सरकार पाडले व त्यांचा एजंट मुख्यमंत्रीपदी आणून बसवला. निवडणूक आयोग, न्यायालयांनी हे सर्व घटनाबाह्य कार्य चालवून घेतले, कारण सत्य हे आज तरी अदाणी यांच्या बाजूने आहे. देशाची लूट, महाराष्ट्राची लूट व एकाच उद्योगपतीची भरभराट यासाठी केंद्र व राज्यातले सरकार झिजते आहे”, अशा शब्दांत अदाणींचा उल्लेख करत महाराष्ट्रातील महायुती सरकारवरही ठाकरे गटानं हल्लाबोल केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray faction slashed at cm eknath shinde government on adani verdict pmw