एकीकडे देशात आगामी लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना दुसरीकडे राम मंदिर व अयोध्येतील उद्घाटन कार्यक्रम यावरून राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिराचं उद्घाटन होणार असून त्या कार्यक्रमाला कुणाला आमंत्रण मिळालं नाही यावरून आरोप-प्रत्यारोप चालू झाले आहेत. यासंदर्भात उद्धव ठाकरेंना आज पत्रकार परिषदेत माध्यम प्रतिनिधींनी प्रश्न विचारले असता त्यांनी त्यावर भूमिका स्पष्ट केली. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावला. अजित पवार गटातील संजय वाघेरे यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“रामलल्ला कुणाचीही खासगी मालमत्ता नाही”

उद्धव ठाकरेंनी भाजपावर टीका करताना “रामलल्ला कुठल्याही एका पक्षाची खासगी मालमत्ता नाही”, असं भाष्य केलं आहे. “रामलल्ला लाखो भक्तांचं श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे भाजपानं त्यांचं राजकारण करू नये. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलाय. केंद्र सरकारने हे केलेलं नाही. त्यामुळे मला आमंत्रण मिळण्या न मिळण्याचा प्रश्नच येत नाही. माझ्या मनात जेव्हा येईल, तेव्हा मी अयोध्येला जाईन. आज मला वाटलं तर आजही मी अयोध्येला दर्शनाला जाऊ शकतो. मला कुणाच्याही आमंत्रणाची गरजच नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“इथे मीच सगळं केलं अशी फुशारकी कुणी मारू नये. तिथे हजारो करसेवकांनी लढा दिला होता. त्यासाठी आडवाणींचे खास धन्यवाद आहेत. आडवाणींनी ती रथयात्रा काढली नसती तर हा मुद्दा आलाच नसता. मी तर ऐकलं की आडवाणी आणि मुरली मनोहर जोशींनाही निमंत्रण नव्हतं”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

अजित पवार गटाला धक्का; संजोग वाघेरेंचा ठाकरे गटात प्रवेश; म्हणाले, “या मंडळींनी…!”

देवेंद्र फडणवीसांना टोला!

दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही टोला लगावला. ‘फडणवीस म्हणतात बाबरी पाडताना आम्हीच होतो – शिवसैनिक असतील तर त्यांनी ते सिद्ध करावं’ असा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला असता त्यावर उद्धव ठाकरेंनी खोचक टिप्पणी केली.

“देवेंद्र फडणवीसच चढले असतील आणि त्यांच्या वजनानेच बाबरीचा ढांचा पडला असेल तर मला माहिती नाही. पण तेव्हा सुंदरसिंह भंडारी, लालकृष्ण आडवाणी यांच्या याबाबत प्रतिक्रिया आहेत. त्यामुळे फडणवीसांचा गृहपाठ थोडा कमी पडला असावा. काही लोक त्यांच्या शाळेच्या सहलीसाठी कदाचित गेले असतील तिथे. त्या वयाचे होते ते तेव्हा”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे.

“जनतेला त्यांचा ढोंगीपणा कळतोय. ते शिवसेनाप्रमुखांबद्दल, शिवसेनेच्या योगदानाबद्दल असं बोलू शकतात म्हणजे यांची मानसिकता कशी आहे हे लोकांना कळतंय. त्यामुळे मी फडणवीसांना धन्यवाद देतो की त्यांनीच त्यांचा ढोंगीपणाचा बुरखा उतरवला”, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray mocks dcm devendra fadnavis on ram mandir ayodhya temple narendra modi pmw