महाराष्ट्रात महाविकास आघाडीला चांगंल यश मिळालं. लोकसभेच्या निमित्ताने महाविकास आघाडीला महाराष्ट्रात भविष्य असल्याचं राजकीय वर्तुळातून म्हटलं जातंय. दरम्यान, महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. परंतु, काँग्रेसच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. यावरून ठाकरे गटावर सातत्याने टीका केली जातेय. या टीकेवर उद्धव ठाकरेंनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शनिवारी (१५ जून) झालेल्या पत्रकार परिषदेत तायंनी माणिक वर्मा यांच्या कवितेतून विरोधकांवर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीत जागा वाटपामध्ये ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळाल्या. परंतु, काँग्रेसचा परफॉर्मन्स चांगला राहिला, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी माणिक वर्मांची कविता गाऊन दाखवली. ते म्हणाले, “एक जुनं गाणं आहे. तुम्हाला माहिती आहे की नाही हे माहीत नाही. परंतु, शरद पवारांना माहीत असेल. ‘पारिजात फुलला दारी, फुले का पडती शेजारी” असं म्हणताच पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला. त्यानंतर त्यांनी लागलीच, तरी देखील आम्ही पारिजातकाला खतपाणी घालण्याचं सोडणार नाही, असं स्पष्ट केलं.

हेही वाचा >> “भाजपाचा अजिंक्यपणा फोल, लोकसभा अंतिम नाही, ही लढाई…”; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, विधानसभेचं गणितही सांगितलं

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

“लोकसभा निवडणुकीत असं वातावरण होतं की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कोणी लढवू शकत नाही. पण त्यांचा हा अजिंक्यपणा किती खोटा हे महाराष्ट्रातील जनतेने दाखवून दिलं. त्यामुळे जनतेचे आम्ही आभार मानतो. लोकसभेची निवडणूक ही संविधान वाचवण्यासाठी एक लढाई होती. मला माझा अभिमान आहे, कारण मी माझ्या भाषणाची सुरुवात देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो अशी करायचो. त्या सर्व नागरिकांनी इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला जो कौल दिला त्यामुळे हा विजय झाला. पण हा विजय अंतिम नाही तर ही लढाई सुरू झाली आहे”, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

विधानसभा एकत्र लढणार

“जेव्हा तीन पक्ष एकत्र पत्रकार परिषद घेतात, तेव्हा माध्यमांसमोर येण्याआधी आमची प्राथमिक बैठक होते. येणारी विधानसभेची निवडणूक जे जे लोक आमच्याबरोबर आहेत. तसेच महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटना आणि छोटे पक्ष मिळून आम्ही निवडणूक लढणार आहोत”, असं आगामी विधानसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचं गणित उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा >> “धडा घेणं गरजेचं”, सांगलीच्या जागेवरून पृथ्वीराज चव्हाणांचा उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला; म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या विरूद्ध…”

पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

“महाविकास आघाडीला महाराष्ट्रत मोठं यश मिळालं. या निवडणुकीत आमचे तीन पक्ष असले तरी छोटे-मोठे पक्ष आणि काही संघटना आणि काही सामाजिक कार्यकर्ते आमच्याबरोबर होते. त्यामुळे या सर्वांचे आभार आम्ही मानतो. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने मोठा पाठिंबा दिला. भाजपाला शेतकऱ्यांनी चांगला धडा शिकवला. काही ठिकाणी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न कऱण्यात आला. मात्र, धार्मिक ध्रुवीकरणाचा निवडणुकीत काहीही परिणाम झाला नाही. आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमची प्राथमिक बैठक झाली. लोकसभेप्रमाणे आम्ही विधानसभेची निवडणूकही लढणार आहोत”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनीही स्पष्ट केलं.