सध्या देशभरात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची चर्चा चालू आहे. या राज्यांमध्ये सर्वच पक्षांनी कंबर कसून प्रचार सुरू केला आहे. मध्य प्रदेशात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रचारसभांमधून विरोधकांवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. मात्र, या प्रचारसभांचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणात दिसू लागले आहेत. एकीकडे शरद पवारांनी मोदींच्या भाषणांवर टीकास्र सोडलं असताना दुसरीकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून या भाषणांवर तीव्र आक्षेप घेत निवडणूक आयोगासमोर काही प्रश्न ठेवले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मध्य प्रदेशमधील प्रचारसभेतल्या भाषणावर तीव्र आक्षेप घेतला. “देशात काही राज्यांमध्ये निवडणुका चालू आहेत. क्रिकेटमध्ये काही नियम असतात तशीच निवडणुकीत आचारसंहिता असते. शिवसेनेच्या वतीने आम्ही निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय. काही शंकांवर खुलासा होण्यासाठी. निवडणूक आयोगाचं धोरण अनेकदा असं दिसतंय की भाजपा फक्त सत्तेवर असल्यामुळे त्यांना फ्री हिट द्यायची आणि आम्ही काही केलं तर आमची हिट विकेट काढायची. याला मुक्त वातावरणातल्या निवडणुका म्हणता येणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“१९८७ साली पार्ल्यात पोटनिवडणूक झाली होती. आमच्याकडून रमेश प्रभू जिंकले होते. भाजपा आमच्या विरोधात होती. ही पहिली निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढलीच नाही तर जिंकली गेली. तेव्हा शिवसेनाप्रमुखांचाही मतदानाचा अधिकार ६ वर्षांसाठी काढून घेण्यात आला. कारण हिंदुत्वाचा प्रचार केला. आज मात्र आम्हाला वाटतंय की निवडणूक आयोगाने आचारसंहितेत बदल केले असावेत. ते केले असतील तर सगळ्यांना ते सारखेच असायला पाहिजेत. ते सगळ्यांना कळले पाहिजेत”, असा मुद्दा उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.

“मध्य प्रदेशच का? देशभरातल्या लोकांना मोफत दर्शन करवून द्या”

“काही महिन्यांपूर्वी कर्नाटकमध्ये निवडणुका झाल्या. तिथे स्वत: मोदींनी बजरंग बली की जय म्हणून मतदानाचं बटण दाबण्याचं आवाहन लोकांना केलं. काल-परवा अमित शाहांनी मध्य प्रदेशात भाजपाला निवडून दिलं तर रामलल्लाचं दर्शन फुकट करून दिलं जाईल अशी घोषणा केली. आमची मागणी आहे की अमित शाह देशाचे गृहमंत्री आहेत. फक्त मध्य प्रदेश नसून देशभरातल्या राम भक्तांसाठी भाजपाकडून मोफत अयोध्यावारी करून दिली जावी. फक्त २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या उद्घाटनावेळीच नाही, तर जेव्हा लोकांना वाटेल, तेव्हा ते दर्शन मोफत घडवून दिलं गेलं पाहिजे”, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

“..याची किंमत पंतप्रधानांना चुकवावी लागेल”, शरद पवारांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल; म्हणाले, “हे पहिले पंतप्रधान आहेत जे…”

“बाळासाहेब ठाकरेंवरची कारवाई योग्य होती का?”

“निवडणूक आयोगाने यासंदर्भात खुलासा करावा. जर पंतप्रधान मतदान करताना बजरंग बली की जय म्हणण्याचं आवाहन करतायत, तर मग आम्हीही येत्या निवडणुकीत जनतेला आवाहन करतो की जय भवानी, जय शिवाज, हर हर महादेव, जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया म्हणून मतदान करावं. ज्या कारणामुळे बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता, तो योग्य होता की आत्ता पंतप्रधान-गृहमंत्री करतायत ते योग्य आहे? आचारसंहितेत बदल केला असेल, तर ते आयोगानं स्पष्ट करावं. आम्ही यासाठी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे”, असं उद्धव ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray slams amit shah madhya pradesh election rally speech free ayodhya tour pmw