शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सौगात ए मोदी वरुन भाजपावर जोरदार टीका केली. तसंच भाजपाने झेंड्यावरचा हिरवा रंग कधी काढणार ते सांगावं किंवा हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं असंही उद्धव ठाकरेंंनी म्हटलं आहे.
सौगात ए मोदीवरुन उद्धव ठाकरे आक्रमक
आमच्याकडचे काही उडाणटप्पू आहेत ज्यांचा उल्लेख अनिल परब यांनी भाषणात केला होता, ते टोपी घालून सौगात कशी देतात? तेच आता आम्हाला बघायचं आहे. आम्हाला म्हणजे शिवसेनेला मुस्लिम मतं मिळाली शिवसेना एकच आहे एसंशि ही शिवसेना नाही, तो एक गट आहे. त्या गद्दार सेनेबद्दल मी बोलत नाही. शिवसेनेला मुस्लिम समाजाने मतदान केल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले आणि त्यांनी एक आवई उठवली होती की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मुस्लिमांनी उद्धव ठाकरेंना मत दिलं तो सत्ता जिहाद आहे. आता मला एका गोष्टीचा आनंद आहे की इथे जे बोंबलत फिरत होते बुरसटेलेले हिंदुत्वादी, बोगस हिंदुत्ववादी यांना पाचर बसली आहे. कारण सौगात ए मोदी हा कार्यक्रम भाजपाने हाती घेतला आहे.
सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता
सौगात ए मोदी हा कार्यक्रम भाजपाने हाती घेतला आहे. ३२ लाख कुटुंबाना भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन सौगात म्हणजे भेट देणार आहेत. सत्तेसाठी हे कुठल्याही थराला जाऊ शकतात याचं हे एक उदाहरण आहे. हे सौगात ए मोदी नाही तर सौगात ए सत्ता आहे. महाराष्ट्राच्या निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे म्हणायचं, एक है तो सेफ है चा नारा द्यायचा. होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि ईद जवळ आली की त्यांना पुरणपोळी द्यायची असं हे धोरण आहे.
हिंदुत्व सोडल्याचं भाजपाने जाहीर करावं-उद्धव ठाकरे
मी याआधीही एक दोनदा बोललो की तुम्ही आमच्यावर हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता तो करण्यापूर्वी तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा. आता भाजपाचं ढोंग उघडं पडलं आहे. हिरवा रंग ते काढत नाहीत. मोदी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी म्हणाले होते मंगळसूत्र चोरलं जाणार, आता हिंदुत्ववादी पक्ष आहे का जो हिंदुंच्या मंगळसूत्राची रक्षा करणार? महाराष्ट्र विधानसभेच्या वेळी निवडणुकीपूर्वी विविध आश्वासनं देण्यात आली. शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण अशा योजनांच्या थापा मारल्या. नंतर आम्ही त्या गावचेच नाही अशा पद्धतीची वक्तव्यं येत आहे. तसं सौगात ए सत्ता जी आहे ती बिहार आणि काय राज्यांच्या निवडणुकीपुरतीच राहणार आहे की पुढेही राहणार आहे हे भाजपाने जाहीर करावं. तसंच आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणे जाहीर करावं. असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.