ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री असताना खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी मुंबईत आंदोलन केलं होतं. थेट मातोश्रीच्या बाहेर त्यांनी घोषणाबाजी करत हनुमान चालीसा पठण केलं होतं. आता उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर असताना आज ते अमरावतीमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राणा दाम्पत्य या दोन्ही बाजूंकडून बॅनरबाजी करण्यात आली. शिवाय, दोन्ही बाजूंनी एकमेकांचे बॅनर फाडल्यामुळे अमरावतीमध्ये राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी अमरावतीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राणा दाम्पत्याला खोचक टोला लगावला.
“काही लोकांना तात्पुरतं महत्त्व मिळतं”
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालीसा पठण करत थेट मातोश्रीच्या बाहेर आंदोलन केलं होतं. त्यावेळी त्यांना अटकही करण्यात आली होती. त्यानंतर आज आधी बॅनरबाजी आणि नंतर बॅनर फाडण्याचे प्रकार घडले. यासंदर्भात उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली.
“या सगळ्या गोष्टी तात्कालिक असतात. काही लोकांना काही काळापुरतं महत्त्व मिळतं. नंतर ते लोक जनतेच्या आठवणीतही राहात नाहीत. त्यामुळे अशा लोकांबद्दल न बोललेलं बरं”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
“अमरावतीची जागा आधीपासून शिवसेनेचीच”
दरम्यान, ज्या लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा लोकसभेवर निवडून जातात, तो अमरावती मतदारसंघ शिवसेनाच जिंकत आल्याचं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “गेल्या अनेक वर्षांपासून अमरावतीची जागा शिवसेनाच जिंकत आली आहे. गेल्या वेळी थोडी चूक झाली, म्हणून कारण नसताना काही लोकं तिथे बसली. पण काही लोकांचं महत्त्व काही काळापुरतं असतं”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.
“शिवसेना नाव आयोग कुणालाही देऊ शकत नाही”
दरम्यान, निवडणूक आयोग पक्षचिन्ह इतरांना देऊ शकतो, पण शिवसेना हे नाव माझ्याकडेच राहील, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “आत्तापर्यंत पक्ष तोडणं ही काही नवीन गोष्ट नव्हती. आता पक्ष चोरू लागले आहेत. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिलं होतं. ते नाव देणं निवडणूक आयोगाचा अधिकारच नाहीये. चिन्ह देणं, न देणं हा त्यांचा अधिकार आहे. पण पक्षाचं नाव ते कुणाला देऊ शकत नाही. निवडणूक आयोगाला हवं असेल तर त्यांनी इथे येऊन लोकांशी चर्चा करावी. पक्षाचं नाव बदलणं हे निवडणूक आयोगाचं काम नाहीये”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.