लोकसभेच्या निकालानंतर मुंबईबाहेर पडलो आणि शिवसेना प्रमुखांच्या संभाजीनगरमध्ये पहिल्या प्रथम आलो आहे. जमलेल्या शिवसेना प्रमुखांच्या लढवय्या, कट्टर बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. या संभाजी नगरमध्ये मुद्दाम आलो आहे, जे गद्दार जिंकले आहेत, त्यांना सांगायला आलो आहे की येत्या निवडणुकीत संभाजी नगर जिंकणारच असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मोदी सरकारचं उधळलेलं खेचर ४०० पार करणार होतं. आपण त्या खेचराला महाराष्ट्रात ४० वरुन ९ वर आणलं. आपल्या विजयी खासदारांमध्ये संभाजी नगरचा खासदार नाही याचं शल्य मला आहे, शिवसेनाप्रमुखांनाही असणार. या ठिकाणी हार झाली आहे हे वास्तव आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रकांत खैरे निष्ठावान सैनिक

आपले उमेदवार चंद्रकांत खैरे हे भगवा एके भगवा, शिवसेना एके शिवसेना हा ध्यास घेऊन राहिले. त्यांचा पराभव झाला असला तरीही त्यांच्या निष्ठेचा मी आदरच केला. हार-जीत होत असते. निवडणुकीमध्ये हरलो तर आयुष्य संपत नाही. मी लढणारा आहे, मी पुन्हा जिंकेन या इच्छेने मी संभाजी नगरमध्ये आलो आहे. काय घडलं? कसं घडलं याचा विचार झाला पाहिजे. आता विधानसभेच्या निवडणुका येत आहेत. लोकसभेची लढाई ही देशाची, संविधानाची लढाई होती. आता येणारी निवडणूक महाराष्ट्राच्या अस्मितेची ओळख आहे. महाराष्ट्राची ओळख काय लिहून ठेवायची इतिहासात? हे ठरवणारी निवडणूक आहे. मी गद्दार, लाचार यांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले.

गळती सरकारचं शेवटचं अधिवेशन

गळती सरकारचं शेवटचं अधिवेशन आहे. हे पुन्हा गादीवर बसणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. माता-भगिनींना समोर ठेवून निवडणुकीला सामोरं जायची तयारी यांनी सुरु केली आहे. गेली १० वर्षे मोदी सत्तेत आहेत. मागच्या दहा वर्षांत ज्या योजना जाहीर केल्या त्यातल्या किती अंमलात आणल्या? शेतकऱ्यांना नुसतं वीज-बिल माफी करु नका. सगळी थकबाकी वसूल करणार आणि वीज बिल माफ करणार हे करु नका. शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडली जात आहेत. हे सरकार म्हणून जे जुमलेबाज आहेत त्यांनी थकबाकीसह वीच बिल माफ करतो असं जाहीर करावं असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ

मी नेहमी सांगतो, योजनांचा सुकाळ आणि अंमलबजावणीचा दुष्काळ आहे. या सरकारच्या पापाचा बुरखा फाटला आहे. मशाल घेऊन किती पापं जाळणार? योजनांच्या पांघरुणाखाली या सरकारला लपायचं आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अद्यापही थांबलेल्या नाहीत. मी मुख्यमंत्री असताना कर्जमुक्ती करुन दाखवली होती. कदाचित तो माझा मूर्खपणा असेल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

गद्दारांनी चोरुन विजय मिळवला

या गद्दारांनी चोरुन विजय मिळवला आहे. शिवसेना चोरली, धनुष्यबाण चोरला. अरे चोरट्यांनो, भामट्यांनो तुमचा विजय हा खरा विजय नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचंही तेच झालं, पक्ष चोरून अजित पवारांना दिला. शिवसेनाप्रमुखांचं नाव त्यांनी राष्ट्रपुरुषांच्या यादीत टाकलं. आपल्याला वाटलं की चला यांचा चांगला विचार आहे. पण त्यांच्या फोटोचा वापर करण्यासाठी यांनी हे कपट केलं. ग्रामीण भागात, शहरी भागात बाळासाहेबांचा फोटो लावायचा आणि धनुष्याबाण बाळासाहेबांचा आहे हे सांगून चोरुन मतं मागायची. मला अभिमान आहे मी ज्या जागा जिंकल्या त्याचा. अनेकांनी मला सांगितलं की आम्ही धनुष्यबाणाच्या चिन्हाला मतं दिली. कारण मशाल लोकांपर्यंत उशिरा पोहचली. आता मशालीच्या माध्यमांतून यांची पापं आपल्याला जाळायची आहेत. हे विसरु नका असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. गद्दार झालो तरीही चालेल पण मी खुर्ची सोडणार नाही हे यांचं (एकनाथ शिंदे) धोरण. मी उलट म्हणतो खुची गेली तरीही चालेल पण मी गद्दारी करणार नाही हे माझं तुम्हाला वचन आहे. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

चंद्रकांत खैरै यांनी भाषणातून व्यक्त केली नाराजी

छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसंकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे छत्रपती संभाजी नगरमध्ये आले आहेत. भाजपाचे नेते आणि माजी उपमहापौर राजू शिंदेंसह शेकडो कार्यकर्ते शिवसेना उद्धव ठाकरे गटात आले आहेत. यावरुन चंद्रकांत खैरेंनी नाराजी व्यक्त केली. राजू शिंदेंनीच मला पाडलं आणि त्यांनीच संदिपान भुमरेंना २५ हजार मतं मिळवून दिली असं चंद्रकांत खैरे म्हणाले. यावेळी इतर मान्यवरांचीही भाषणं पार पडली. त्यानंतर उद्धव ठाकरेंचं भाषण झालं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray speech at chhatrapati sambhaji nagar slams ekanth shinde scj
Show comments