अलिबाग : नीतिशून्य, विचारशून्य पक्ष गेली दहा वर्षे आपल्या देशावर राज्य करतो आहे. याची मला लाज वाटते आहे. त्यामुळे यापुढे असे होता कामा नये असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. ते अलिबाग तालुक्यातील चौल येथे जनसंवाद मेळाव्यात बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्याच्या दोनदिवसीय जनसंवाद दौऱ्याला गुरुवारपासून सुरुवात केली. पहिल्या दिवशी त्यांनी पेण, अलिबाग आणि रोहा तालुक्यात जनसंवाद मेळावे घेतले. भगव्याला लागलेला कलंक पुसण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. यावेळी शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर, माजी खासदार अनंत गिते, जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, उपस्थित होते. हेही वाचा >>> “छगन भुजबळ भाजपाच्या वाटेवर?” ‘या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण, कुणी उपस्थित केलाय हा प्रश्न? तोडा फोडा आणि झोडा ही भाजपची निती आहे. जातीपातीत भांडणे लावायची, समाजात तेढ निर्माण करायची, हिंदू मुस्लिम दंगे निर्माण करायचे आणि आपल्या राजकीय पोळया शेकायच्या हा कार्यक्रम सुरू आहे. त्यामुळे लोकांनी सतर्क करणे गरजेचे आहे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भाजप ही भेकड आणि बेडूक जनता पार्टी आहे. या पक्षातून त्या पक्षात जाणारे, कर्तुत्व नसलेले सर्व जण या पक्षात सहभागी झाले आहेत. भाजपमध्ये ना नेते जन्माला आले ना आदर्श त्यामुळे इतर पक्षांतील नेते आणि आदर्श चोरायचे काम भाजपकडून सुरू असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. फडणवीस यांना टोला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाची अट भाजपने त्यावेळी मान्य केली असती तर आज जो चोर बाजार मांडला आहे. तो मांडायची वेळ आली नसती. युती सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस पाच वर्षे मुख्यमंत्री होते. निवडणुकीनंतर त्याच्यावर अडीच वर्ष विरोधी पक्ष नेते होण्याची वेळ आली. घरफोडीनंतर ते मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती. पण त्यांना अर्ध उपमुख्यमंत्रीपद दिले गेले. आता पाव उपमुख्यमंत्री झाले असल्याचा टोला ठाकरे यांनी यावेळी लगावला.