लोकसभा निवडणूक संपताच महाराष्ट्रात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या चार जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. ही निवडणूक प्रक्रिया चालू असून २६ जून रोजी मतदान होणार आहे. यामध्ये मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, नाशिक शिक्षक आणि कोकण पदवीधर मतदारसंघांचा समावेश आहे. विधान परिषदेच्या या निवडणुकीतील उमेदवारीवरून शिवसेनेचा ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. ठाकरे गटाने मविआतील त्यांच्या कोणत्याही मित्रपक्षाशी चर्चा न करता परस्पर चारही जागांवर उमेदवार घोषित केल्यामुळे काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. यावर आज स्वतः ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “आघाडीत कोणताही बिघाड झालेला नाही, मात्र आमच्यातलं कनेकश्न थोडं लूज झालं होतं. आम्ही एकत्रच आहोत. कधीतरी संवाद झाला नाही तर काहीतरी गडबड होते. आमच्यात संवाद झाला नव्हता. लोकसभा निवडणुकीनंतर मी सात-आठ दिवस बाहेर होतो. दरम्यानच्या काळात विधान परिषदेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या. अर्ज भरण्याची तारीख जवळ आली होती. त्यामुळे सर्वांनी आपापले उमेदवार जाहीर केले. आम्ही कोकण आणि नाशिकच्या जागेबाबत बाबत अग्रही आहोत. याबाबत काँग्रेसचं म्हणणं काय आहे ते दिल्लीतील काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी मला फोन करून सांगितलं, संजय राऊत (ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार) यांच्याशी देखील त्यांचं बोलणं झालं आहे. जागांबाबत आमच्यात सर्वकाही ठरलं आहे. आम्ही काय ठरवलंय ते थोड्याच वेळात तुमच्यासमोर जाहीर करू. निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी इथे नव्हतो. अशातच उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ हातची जाऊ नये म्हणून आम्ही चारही जागांवर अर्ज भरले हे खरं आहे. मात्र आता आम्ही चर्चा करून काही वेगळे निर्णय घेतले आहेत. थोड्याच वेळात ते जाहीर केले जातील.”

मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाने अनिल परब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने अनिल परब यांनी काही वेळापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचं निवडणुकीचं संकल्पपत्र जाहीर केलं. यावेळी परब आणि ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदही घेतली. उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत बोलत होते.

हे ही वाचा >> चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; अभिनेते पवन कल्याण कॅबिनेट मंत्री

उद्धव ठाकरे म्हणाले, आमचे उमेदवार अनिल परब यांनी आत्ताच त्यांच्या संकल्पपत्राचं लोकार्पण केलं आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघ गेल्या पाच टर्मपासून आमच्याकडे आहे. प्रमोद नवलकर यांनी येथून पदवीधरांचं प्रतिनिधीत्व केलं होतं. सुशिक्षित मतदारांचे प्रश्न वेगळे असतात, ते प्रश्न आम्ही गेल्या अनेक दशकांपासून मांडत आलो आहोत, शिवसेनेच्या माध्यमातून पदवीधरांचे प्रश्न सोडवत आलो आहोत. त्यामुळे मी तमाम पदवीधरांना विनंती करतो की तुम्ही मतांच्या रुपाने याआधी आम्हाला आशीर्वाद दिला आहे. आता पुन्हा एकदा मतदान करून आपलं नातं दृढ करा.