कराड : छत्रपती शिवाजीमहाराजांची शौर्यभूमी असलेला सातारा कोणत्याही देशभक्तासाठी तीर्थक्षेत्रापेक्षा कमी नाही. मिलिटरी अपशिंगे गावाने तर, शिवरायांच्या आदर्शांनुसार देशसेवेचे देदीप्यमान कार्य केले आहे. अशा शिवरायांचे वारसदार उदयनराजे भोसले हे भाजपने उमेदवार दिलेत. साताऱ्यात पूर्वापार भगवा फडकण्याची परंपरा असल्याने आताही उदयनराजेंच्या विजयाचा भगवाच फडकेल, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीरामांची मूर्ती भेट देवून स्वागत

सातारा लोकसभा मतदारसंघातील ‘महायुती’चे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ आयोजित महाविजय संकल्पसभेत ते बोलत होते. प्रारंभी शिवरायांच्या मूर्तीला नरेंद्र मोदी, रामदास आठवले आणि उदयनराजे हे पुष्पांजली अर्पण करून नतमस्तक झाले. त्यांनतर उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी भगवी शाल पांघरत प्रभू श्रीरामांची चांदीची मूर्ती भेट देवून मोदींचे स्वागत केले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेश शिंदे, भाजपचे महामंत्री विक्रांत पाटील, सातारा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, विक्रम पावसकर, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, धैर्यशील कदम, प्रा. मच्छिंद्र सकटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

हेही वाचा…मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही – नरेंद्र मोदी

पंतप्रधानपदावरील व्यक्तीची पहिली प्रचारसभा

पंतप्रधानपदावरील व्यक्तीची कराडमधील ही पहिलीच सभा गर्दीचे सर्व उच्चांक मोडणारी ठरली आहे. ऐन उन्हात मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादामुळे महायुतीत चैतन्य दिसत होते.

मराठीतून भाषणास सुरुवात

छत्रपती शिवाजीमहाराज, छत्रपती संभाजीमहाराज, छत्रपती राजर्षी शाहूमहाराज यांचा जयघोष करीत कृष्णाकाठच्या जनतेला माझा नमस्कार असे मराठीतून नरेंद्र मोदी यांनी भाषणास सुरुवात करताच, एकच टाळ्यांचा कडकडाट होताना, मोदी, मोदी असा उपस्थित जनसागराने जोरदार जयजयकार केला.

हेही वाचा…सर्वसामान्यांचे जगणं मुश्किल करणाऱ्या मोदींना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही – शरद पवार

शिवरायांच्या विचाराची ऊर्जा

मोदी म्हणाले, भाजपने मला २०१३ मध्ये पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केल्यावर प्रथम मी रायगडावर गेलो. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या समाधीस्थळी त्यांचे स्मरण करण्यासाठी ध्यानस्थ झालो, त्यावर मला जी ऊर्जा अन् प्रेरणा मिळाली, त्या पवित्र मातीने दिलेल्या आशीर्वादावर मी १० वर्षे प्रभावीपणे देशाचे नेतृत्व करू शकलो. आजही महत्वाच्या कामावेळी मला शिवरायांचे स्मरण होते असे मोदी यांनी सांगितले.

काँग्रेसचा समाचार

काँग्रेसवर हल्लाबोल चढवताना ते म्हणाले, देश १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. पण, काँग्रेसने देशात गुलामगिरीची मानसिकता कायम ठेवली. शिवरायांच्या नौदलावर साऱ्या जगाचा विश्वास असलातरी देशाच्या नौदलाच्या ध्वजावर ब्रिटिशांची मुद्राच होती. आम्ही ती हटवून शिवमुद्रा आणली. ऐतिहासिक लोहगड, सिंधुदुर्ग, जिंजीसारख्या शिवरायांच्या किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये नामांकन दिले.

जम्मू काश्मीरमध्ये संविधान लागू नव्हते. भाजपने ३७० कलम हटवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लागू करत तेथील जनतेला न्याय हक्क आणि आरक्षणाचा लाभ मिळवून दिला.

हेही वाचा…काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवली – मुख्यमंत्री शिंदे

कर्नाटकात आरक्षणावर दरोडा

संविधानाने धर्मावर आरक्षण देता येत नाही. पण काँग्रेसने आरक्षणाच्या नावावर लोकांना झुलवून स्वार्थ साधला. कर्नाटकातील काँग्रेस सरकारने ओबोसींच्या आरक्षणात मुस्लिमांना घुसवून ओबोसींच्या २७ टक्के आरक्षणावर एका रात्रीत दरोडा टाकला. कर्नाटकातील सर्व मुस्लिमांना ओबीसी घोषित करून, आरक्षण दिले. आता संविधान बदलून काँग्रेसला कर्नाटकातील पॅटर्न देशभर लागू करायचा आहे. पण, मोदी जिवंत असेपर्यंत कोणी संविधान बदलू शकत नाही आणि धर्मावर आधारित आरक्षण आणण्याचा प्रयत्न सुध्दा करू शकणार नसल्याचे मोदींनी सांगितले.

काँग्रेसचा घराघरातील संपत्ती लुटण्याचा इरादा

आपल्या सरकारने वैद्यकीय शिक्षणाच्या जागा वाढवल्या. सर्वसामान्य व गरिबांच्या मोफत धान्य, आरोग्य सेवा, शेतकरी, महिला व वंचित सर्वच घटकांना आवश्यक सर्व सुविधा मोफत दिल्या आहेत. पण, दुसरीकडे काँग्रेसचा लोकांच्या जमिनी, पैसे आणि दागिन्यांसह घराघरातील संपत्ती लुटण्याचा इरादा असल्याची टीका मोदी यांनी केली.

हेही वाचा…सांगली : तपमान ४१ वर, प्रचारासह दैनंदिन कामावर परिणाम

काँग्रेसने सैनिकांना वंचित ठेवले

काँग्रेसने सैनिकांच्या कुटुंबियांना वन रँक वन पेन्शनपासून वंचित ठेवले. मात्र, भाजपने वन रँक वन पेन्शन लागू करताना, एक लाख कोटींहून अधिक रक्कम देवूनही टाकली आहे. भारतीय सेनेकडे आज स्वदेशी बनावटीची शस्त्रे असल्याचे ते म्हणाले.

मोदी सरकार शिवरायांच्या विचाराचेच

उदयनराजे भोसले म्हणाले, छत्रपती शिवाजीमहाराजांनी राज्यकारभार करताना लोकसहभागाची भूमिका घेतली. यातूनच लोकशाही स्थापन झाली. मोदी सरकार शिवरायांच्या याच विचार आणि संकल्पावर चालले आहे. काँग्रेसकडून शेतकरी, जनतेच्या कल्याणासाठी फक्त घोषणा झाल्या. मात्र, त्या सत्यात उतरवण्याचे काम मोदींनी केले. काँग्रेसला मोठा अहंकार होता. पण, लोककल्याणाचा विचार करून भाजपने करून दाखवले. त्यामुळे जनसामान्यांच्या हितासाठी नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्याचे काम सर्वांना करायचे असल्याचे आवाहन उदयनराजेंनी केले.

हेही वाचा…मविआच्या एकसंघपणामुळे विजय निश्चित – चंद्रहार पाटील

आठवल्यांच्या कवितांवर हस्याकल्लोळ

शशिकांत शिंदे उभे राहून फसले, उदयनराजे दिल्ली जाऊन बसले. शिंदेंची भानगड पाहून वाशीतले लोक हसले, उदयनराजे दिल्ली जाऊन बसले, अशा काव्यपंक्ती रामदास आठवले यांनी सादर करताच उपस्थितांमध्ये हस्याकल्लोळ झाला. टाळ्या व शिट्ट्यांच्या गजरात त्यांच्या कवितांना दाद मिळाली. भाजपवर संविधान बदलाची टीका केली जाते. परंतु, संविधान आणखी मजबूत करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून होत असल्याचा दावा त्यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udyan raje bhosle will win this time in satara lok sabha seat prime minister narendra modi expressed this firm belief psg
Show comments