सोलापूर : जलसंपदा विभागामार्फत शेती सिंचनासाठी उजनी धरणातून उद्या ४ जानेवारीसह, १ मार्च आणि १ एप्रिल अशा तीनवेळा पाण्याची आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पहिले आवर्तन १४.१७ टीएमसी एवढे राहणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी सोलापुरात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. या समितीची बैठक एरव्ही पुण्यात होते. परंतु यंदा प्रथमच ही बैठक सोलापुरात झाली. येत्या फेब्रुवारीमध्ये या समितीची बैठक पुन्हा घेऊन पाण्याचे आवर्तन वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

हेही वाचा – उजनी धरणातील गाळ काढण्याचा निर्णय तज्ज्ञांच्या अहवालानंतर, जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांचे स्पष्टीकरण

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात झालेल्या उजनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी आणि नागरिकांना पिण्यासाठी संपूर्ण उन्हाळ्यात पाणी उपलब्ध राहण्याच्या दृष्टीने सूक्ष्म नियोजन करण्याचे ठरले. धरणात मुबलक पाणी उपलब्ध आहे म्हणून पाण्याची उधळपट्टी अजिबात करू नये आणि सोडलेल्या आवर्तनातून पाण्याची बचत करावी, अशा सूचना विखे-पाटील यांनी दिल्या.

उजनी धरणात सध्या उपयुक्त पाणीसाठा ५१.९२ टीएमसी, अचल पाणीसाठा ६३.६६ टीएमसी तर एकूण पाणीसाठा ११५.५८ टीएमसी (९७९२ टक्के) एवढा आहे. मागील वर्षी धरणात ६०.६६ टक्के एवढाच पाणीसाठा उपलब्ध होता. या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे, धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह सुभाष देशमुख, देवेंद्र कोठे, समाधान आवताडे, राजू खरे, अभिजीत पाटील, नारायण पाटील, उत्तम जानकर, आमदार, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता तथा कालवा सल्लागार समितीचे सचिव सु. सा. खांडेकर, अधीक्षक अभियंता धीरज साळी उपस्थित होते. तर दूरदृश्य प्रणालीद्वारे युवा कल्याण व क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी व अन्य उपस्थित होते.

उजनी धरणातून सोडलेले पाणी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचण्यासाठी जलसंपदा विभागाने कालव्यांमध्ये वाढलेली झाडी-झुडपे काढून टाकावीत. कालव्याच्या कडेला झालेली अतिक्रमणे काढावीत. कालव्यातून पाण्याचा प्रवाह व्यवस्थितपणे शेवटच्या टोकापर्यंत जाण्यासाठी कालव्याच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचना राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या. जलसंपदा विभागाने भीमा नदीवर ११ बॅरेजेस उभारण्याचे प्रस्तावित केले आहेत. तसा प्रस्ताव शासनाकडे आला असून, या बॅरिजेसचे महत्त्व लक्षात घेऊन यातील जास्तीत जास्त बॅरेजेस मंजूर करण्याची ग्वाही त्यांनी दिली.
मागील वर्षभरापूर्वी उजनी डावा कालव्यातील अति पाणी प्रवाहामुळे पाटकुल (ता. मोहोळ) येथे कालवा फुटून ३३० शेतकऱ्यांच्या शेतीचे पिकांचे नुकसान झाले होते. त्या सर्व शेतकऱ्यांना पुढील आठ दिवसांत नुकसान भरपाई देण्याचे आदेश विखे पाटील यांनी दिले. उजनी प्रकल्पाच्या विविध कालव्याच्या अनुषंगाने नागरिक, शेतकरी व कालवा समितीच्या सदस्यांच्या काही तक्रारी, प्रश्न व मागणी असतील तर त्या अनुषंगाने या काळात निर्णय घेऊ, अशी माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा – जालन्यात निबंधक सहकारी विभागात ३० लाख लाच मागणीचे प्रकरण उघडकीस

प्रारंभी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता तथा कालवा सल्लागार समितीचे सचिव खांडेकर यांनी सादरीकरणाद्वारे जलसंपदा विभागाने उजनी धरणाच्या पाण्याचे येत्या मे अखेरपर्यंत केलेल्या सूक्ष्म नियोजनाची माहिती दिली. यात लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे सिंचन व्यवस्थापनासाठी उजनी, सीना-माढा उपसा सिंचन योजना, भीमा-सीना जोड कालवा, दहिगाव उपसा सिंचन योजना असे चार मोठे प्रकल्प, सात मध्यम प्रकल्प, ९० कोल्हापूर बंधारे आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ujani dam agriculture water radhakrishna vikhe patil ssb