अहिल्यानगरः महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अद्ययावत ‘उमेद मॉल’ जिल्हास्तरावर उभारण्यात येईल, तसेच प्रत्येक तालुक्यात ‘उमेद मॉल’ साठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज, रविवारी बोलताना सांगितले.

जिल्हा परिषद व ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या वतीने नाशिक विभागातील, पाच जिल्ह्यांतील महिला बचत गटांच्या उत्पादन विक्रीचे, साईज्योती-२०२५ या प्रदर्शनाचे उद्घाटन तांबटकर मळा (सावेडी) येथे पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राहुल शेळके, विनायक देशमुख आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिला बचतगटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीसाठी राज्यभरात ‘उमेद मॉल’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. ‘उमेद मॉल’च्या माध्यमातून बचतगटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीमध्ये मोठे परिवर्तन येणार आहे. उत्पादित मालाची वर्गवारी करुन, त्या पद्धतीचे मार्केटिंग तयार करावे. मालाच्या ऑनलाईन विक्रीची सुविधा सुरू करण्यात आली असून यात वाढीसाठी प्रयत्न करावेत, त्यास निधीची कमतरता भासू देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठे पाऊल टाकले आहे. विकासातील प्रत्येक उपक्रमात महिलांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात येत आहे.

सीईओ येरेकर म्हणाले, उमेद अभियान ही एक लोकचळवळ बनते आहे. ४ लाख महिलांचा अभियानात समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार १७४ महिला ग्रामसंघ तयार झालेले असून त्यापैकी ७५५ ग्रामसंघांना कार्यालय उपलब्ध करून देणारा अहिल्यानगर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. बचत गटांच्या उत्पादनांना ऑनलाईन बाजारपेठ मिळावी यासाठी ‘उमेद स्मार्ट वेबपोर्टल’ सुरू केले आहे. याद्वारे जिल्ह्यातील ६१ उत्पादने ऑनलाईन विक्रीस उपलब्ध केली. सन  २०२४-२५ या वर्षात ७३ हजार ९०९ महिला लखपती दीदी झाल्या आहेत. 

यावेळी विविध बचतगटांना कर्ज, बँकींग सर्व्हीस मशीन तसेच महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांना बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत मान्यता प्रमाणपत्रांचे वितरण व लखपती दीदीअंतर्गत महिलांचा सन्मानही करण्यात आला.

पालकमंत्र्यांकडून वस्तूंची खरेदी

विभागीय साईज्योती-२०२५ प्रदर्शनात विभागातील अहिल्यानगरसह नाशिक, जळगाव, धुळे व नंदूरबार या पाचही जिल्ह्यातून आलेल्या बचतगटांच्या स्टॉलला पालकमंत्री विखे यांनी भेट देऊन उत्पादित मालाची पाहणी केली, गटांच्या महिलांशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्र्यांनी विविध वस्तूंची खरेदीही केली.

२० मार्चपर्यंत प्रदर्शन खुले

नाशिक विभागातील ५ जिल्ह्यातील एकूण ३२५ बचतगट प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. प्रदर्शनात विविध वस्तूंचे १२० स्टॉल आहेत. यातून २४० बचत गटांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. खाद्य विभागाच्या दालनात ८५ बचतगटांनी तयार केलेल्या चविष्ट व शाकाहारी पदार्थांचे स्टॉल आहेत. पाचही दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून २० मार्चपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

Story img Loader