सावंतवाडी: राजकारण केवळ सत्ताकारण नसून समाजकारण आहे. विकास हाच खरा हेतू असायला हवा. गरीबांचे अश्रू पुसणे, शेतकरी आणि शेतमजुरांचे कल्याण करणे, गावात चांगल्या शाळा आणि उत्तम रस्ते उपलब्ध करून देणे, शुद्ध पाणी मिळवून देणे हे प्राथमिक उद्दिष्ट हवे. जाती, धर्म, भाषा याच्या पलिकडे विचार करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून आप्पासाहेब गोगटे यांनी काम केले आप्पासाहेबांसारखे दैव दुर्लभ नेतृत्व अभावानेच जन्माला येते अशा शब्दात केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देवगडचे माजी आमदार स्व.आप्पासाहेब गोगटे यांचा गौरव केला.
स्व.आप्पासाहेब गोगटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अध्यक्षतेखाली सोमवारी झाला. यावेळी महाराष्ट्राचे बंदर विकास व मत्स्यव्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे, माजी आमदार अजित गोगटे, माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, प्रकाश गोगटे, माजी आमदार डॉ. विनय नातू, राष्ट्रीय वकील संघटनेचे अध्यक्ष अँड संग्राम देसाई, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, श्वेता कोरगावकर, स्नेहलता देशपांडे, काका ओगले, अश्विनी भावे, शामकांत काणेकर, अँड नकुल पार्सेकर, संदीप साटम, बाळ खडपे, सुधीर जोशी, सदा ओगले, वैभव बिडये यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
जातीपातीच्या पलीकडे विचार केला पाहिजे
यावेळी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी म्हणाले, जातपात धर्म विसरून केवळ माणुसकी म्हणून काम करण्याची करण्याचा आप्पासाहेब गोगटे यांचा स्वभाव होता. भगवान श्रीकृष्ण यांनी आपल्या नावामागे कधीही “यादव” लावले नाही, तसेच परशुरामांनी “शर्मा” लावले नाही. त्यामुळे आपणही जातीपातीच्या पलीकडे विचार केला पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी माणूस ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन यांचा उपयोग करून पुढे जायला हवा.
कार्याची दखल घेतल्याचे वेगळे समाधान
नितीन गडकरी म्हणाले, मी आणि माझी पत्नी बौद्ध धर्माच्या ठिकाणी गेलो होतो. त्या वेळी भगवान गौतम बुद्धांचे दर्शन घेतले आणि बोधी वृक्षाखाली उभा असताना वटवृक्षाचे पान माझ्या खांद्यावर पडले. तेव्हा उपस्थित बौद्ध भिकूंनी सांगितले की हे भगवान बुद्धांचे आशीर्वाद आहेत. अशा प्रसंगातून आपण समाजासाठी केलेल्या कार्याची दखल घेतली जाते, याचा आनंद होतो.