Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे त्यांच्या विकासाभिमुख प्रकल्पांसाठी ओळखले जातात. त्यांचे रस्ते बांधणी व वाहतूक व्यवस्थापन प्रकल्पांचं काम देशभरात चर्चेत राहिलं आहे. तसेच नितीन गडकरी राजकीय विषयांवरही स्पष्टपणे बोलतात आणि स्पष्ट भूमिका मांडताना अनेकदा पाहायला मिळतात. त्यामुळे त्यांच्या विधानाबद्दल अनेकदा चर्चा झाल्याचं पाहायला मिळातं. आता त्यांच्या आणखी एका विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित उद्योगांसंदर्भातील एका कार्यक्रमात बोलताना गुंतवणुकदारांना एक सल्ला दिला आहे. ‘गुंतवणुकदारांनी सरकारच्या भरोशावर राहू नये, अनुदानाच्या पैशांची शाश्वती नाही, कारण लाडकी बहीण योजनेलाही पैसे द्यावे लागतात’, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

नितीन गडकरी काय म्हणाले?

“माझं तर म्हणणं आहे की कोणत्याही पक्षाचं सरकार असूद्या. गुंतवणूकदारांनी सरकारला बाजूला ठेवलं पाहिजे. सरकार हे विषकन्या असते. ज्यांच्या बरोबर जाते त्यांना बुडवते. तुम्ही त्यांच्या भरोशावर राहू नका. तुम्हाला अनुदान घ्यायचं आहे घ्या. मात्र, अनुदान कधी मिळेल, कधी नाही याचा काहीही भरोसा नसतो”, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर, “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली म्हणणाऱ्या घरबशांना..”

ते पुढे म्हणाले, “एका जणाने सांगितलं की साडेचारशे कोटी अनुदान आले आहे. टॅक्सचे पैसे जमा आहेत. पुढे त्यांनी विचारलं की पण ते पैसे कधी मिळतील? मी त्यांना म्हटलं परमेश्वराला प्रार्थना करा. कारण काही भरोसा नाही. मग मिळणार का? जेव्हा येईल तेव्हा मिळू शकतात. अनुदानाचे पैसे मिळतील का? याची शाश्वती नाही. कारण लाडकी बहीण योजनेतही पैसा द्यावा लागतो”, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महायुती सरकारने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’ची राज्यात मोठी चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना महिन्याला १५०० रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातात. जवळपास अडीच कोटी लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ देण्याचा महायुती सरकारचा उद्देश असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’वर महाविकास आघाडीचे नेते सातत्याने टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका केली होती. “जानेवारीत पगार द्यायला सरकारच्या तिजोरीत पैसे राहणार नाहीत”, असं राज ठाकरे म्हणाले होते. यातच आता भाजपाचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही यासंदर्भात एक विधान करत ‘गुंतवणुकदारांना अनुदानाचे पैसे मिळतील का? याची शाश्वती नाही. कारण लाडकी बहीण योजनेतही पैसा द्यावा लागतो’, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.