सांगली : सांगली लोकसभेसाठी आघाडीकडे तगडा उमेदवार असून नाव जाहीर होताच भाजपची पळताभुई थोडी होईल, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी आज येथे केला. तासगाव येथे रविवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बठकीत ते बोलत होते. दरम्यान या वेळी बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजप-शिवसेना एकमेकावर टीका करीत असून दोन्ही पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीका केली.
तासगाव बाजार समितीच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आ. सुमनताई पाटील, अरुण लाड, महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे आदी उपस्थित होते. पाटील म्हणाले, की आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आघाडीकडे तगडा उमेदवार असून जशास तसे उत्तर देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. ज्या वेळी उमेदवाराचे नाव जाहीर करू त्या वेळी भाजपला पळताभुई थोडी होईल. गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यांचा पराभव झाला व आज सत्ताधारींच्या बाकावर बसलेले घरवापसीसाठी तयार आहेत. लवकरच त्यांचा पक्षात प्रवेश होईल, असेही त्यांनी सांगितले.
पवार म्हणाले, की युती सरकारच्या काळात नोटाबंदी, जीएसटीसारख्या चुकीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. वर्षांला दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र हे आश्वासन हवेतच विरले. केंद्र आणि राज्य शासन सर्व आघाड्यावर सफशेल अपयशी ठरले आहे. जनतेचे मूलभूत प्रश्न दुर्लक्षित व्हावेत यासाठी भावनिक प्रश्नांना हवा देऊन पुन्हा एकदा मतांचे ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.