Maharashtra Vidhan Parishad Election : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी विधानसभेच्या आमदारांकडून विधिमंडळात मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी १२ उमेदवार उभे आहेत. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव निश्चित मानला जातो. सर्वच राजकीय पक्षांनी मतांचे गणित जुळवण्यावर भर दिला आहे. दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्याकडे पुरेशी मते नाहीत. या दोघांपैकी अधिक कोण जोर लावतो यावर सारी गणिते अवलंबून आहेत. जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना आपलाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जयंत पाटील म्हणाले की, मी पहिल्यांदाच भक्कम पाठिंबा घेऊन निवडणुकीला उभा राहिलो आहे. याच्यापूर्वी कमी मतांनी मी निवडून आलो. पण यावेळी शरद पवारांची साथ मला लाभली आहे. महाविकास आघाडीचे तीनही उमेदवार जिंकून येतील. काँग्रेसचे दोन-तीन आमदार क्रॉस व्होटिंग करणार असल्याचाही खळबळजनक दावा जयंत पाटील यांनी केला.

हे ही वाचा >> पडणारा १२ वा उमेदवार कोण? विधान परिषदेसाठी मतांची जुळवाजुळव सुरू

काँग्रेसचे कोणते आमदार फुटणार?

दरम्यान काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रसचे कोणते आमदार फुटणार आहेत, याबद्दल भाष्य केले. ते म्हणाले, आमचे तीन-चार आमदार फुटणार हे आम्हाला माहीत आहे. त्यानुसार आम्ही रणनीती आखली आहे. आमच्या उमेदवार प्रज्ञा सातव या नक्कीच जिंकून येतील. तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी आज बैठक होत आहे. आमचे जे उमेदवार फुटणार आहेत, त्यांच्या घरातले कुणी ना कुणी राष्ट्रवादीत गेले आहेत. एक टोपीवाला कधी इकडे असतो कधी तिकडे असतो. एक नांदेडवालाही त्यात आहे.

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत कुणाकडे किती मतं? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

“आमचे जे चार आमदार फुटण्याच्या मार्गावर आहेत. त्यांचे कान कसे टोचायचे, यासाठी आता बैठक घेणार आहोत. तशी रणनीती आम्ही आखत आहोत”, असेही आमदार कैलास गोरंट्याल यांनी सांगितले.

हे ही वाचा >> विधान परिषद निवडणुकीत मनसेचा एक आमदार सर्वांचं गणित बिघडवणार? राजू पाटील कोणाला मत देणार?

विधानपरिषदेच्या मतांचा कोटा कसा ठरतो?

एकूण मतदान भागीले जेवढ्या जागा आहेत त्यात एक अधिक करून भागाकार केल्यावर येणाऱ्या संख्येत .१ अधिक केल्यावर येणारी संख्या हा मतांचा कोटा असतो. राज्य विधानसभेची सदस्य संख्या २८८ असली तरी आमदारांचे राजीनामे, अपात्रता किंवा निधनामुळे १४ जागा सध्या रिक्त आहेत. परिणामी एकूण मतदार – २७४

२७४ भागीले ११ एक = २२.८३ १ = २२८४ (त्यातही वैध मतांच्या आधारे मतांचा कोटा ठरतो. एखादे मत बाद झाल्यास कोटा कमी होतो)

एका मताचे मूल्य हे १०० असते.

मतांचा कोटा हा शेकड्यात ठरतो. याचाच अर्थ २२८४ म्हणजेच पहिल्या पसंतीच्या २३ मतांची आवश्यकता असेल.

कोणत्या पक्षाकडे किती बलाबल?

भाजपकडे अपक्षांसह ११२ मते आहेत. पाच उमेदवार निवडून आणण्याकरिता ११५ मतांची आवश्यकता असून, भाजपने पुरेसे संख्याबळ जमविल्याचे सांगण्यात येते. शिवसेना शिंदे गटाकडे दोन उमेदवार निवडून आणण्याऐवढी पुरेशी मते आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांचे गणित जुळविले आहे. काँग्रेसकडे अतिरिक्त मते असल्याने पक्षाला तेवढी भीती नाही. शिवसेना ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्याकडे पुरेशी मते नाहीत. या दोघांपैकी अधिक कोण जोर लावतो यावर सारी गणिते अवलंबून आहेत. एकूण रागरंग बघता शेकापचे जयंत पाटील यांच्यासमोर विजयाचे मोठे आव्हान असेल.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vidhan parishad election peasant party leader jayant patil says congress mla will do cross voting kvg
Show comments