Vijay Wadettiwar vs Pratap Sarnaik ST Bus Fare Hike: इंधन दरवाढ, बसच्या सुट्या भागांची वाढलेली किंमत, महागाई भत्त्यात झालेली वाढ यामुळे एसटीच्या बस प्रवासात १४.९५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. परिवहन विभागाने हा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यभरातील प्रवाशांकडून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. दरम्यान, प्रस्तावित भाडेवाढीची मला कोणतीच कल्पना नव्हती, असं आश्चर्यकारक वक्तव्य खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे. त्यामुळे परिवहन मंत्र्यांना न विचारताच भाडेवाढ झाली का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावरून “परिवहन खात्याला वाली नाही का?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच ते म्हणाले, “सरकारने एसटीची दरवाढ मागे घ्यावी, या खात्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंबंधीचे आदेश मागे घ्यावेत किंवा विभागाला तसे आदेश द्यावेत. कारण त्यांनी स्वतः मान्य केलं आहे की हे आदेश त्यांनी दिलेले नाहीत. त्यांना अशा निर्णयाची कल्पना नव्हती”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विजय वडेट्टीवार म्हणाले, “सरकार म्हणून हा निर्णय प्रताप सरनाईक यांनी घेतला नसेल तर मग हा निर्णय घेतला कोणी? मंत्र्यांना डावलून असे निर्णय कोण घेतंय? मंत्री जर म्हणत असतील की हा निर्णय कोणी घेतला हे त्यांना माहिती नाही तर मग त्यांनी ही दरवाढ मागे घ्यावी आणि गोरगरीब जनतेला दिलासा द्यावा. त्यांचं वक्तव्य ऐकून असं वाटलं की परिवहन खात्याला वालीच नाही. हे खातं कोण चालवतंय तेच कळत नाहीये. उपमुख्यमंत्र्यांना या निर्णयाची कल्पना नाही, परिवहन मंत्र्यांना कल्पना नाही मग हे निर्णय नेमकं कोण घेतंय? सगळी खाती जर अधिकारी चालवत असतील, मंत्री घरी बसून आदेश काढत असतील तर या सगळ्याला पोरखेळ म्हणावं लागेल. ही काय गंमत जंमत चाललीय का? सरकारमधील मंत्र्यांना कसलंही गांभीर्य नाही. अधिकाऱ्यांनी परस्पर निर्णय घेतला असेल तर त्यांच्यावर कारवाई कोण करणार? मुळात कारवाई होणार की नाही? मंत्री अधिकाऱ्यांवर कारवाई करणार की नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. एखादा निर्णय, एखादं प्रकरण अंगलट आलं की माघार घ्यायची, तो निर्णय आम्ही घेतला नाही असं म्हणायचं आणि एखादी चांगली गोष्ट झाली की श्रेय घ्यायचं असा सगळा कारभार चालू आहे.

सरकारमधील नेत्यांकडून दरवाढीचं समर्थन

दरम्यान, सत्ताधारी मंत्र्यांनी मात्र या दरवाढीचे समर्थन केले आहे. “चांगल्या सेवेसाठी एसटीची भाडेवाढ करण्यात आली आहे. महामंडळ कसे चांगले चालेल, यासाठी सरकार प्रयत्नशील आहे”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एसटी भाडेवाढीचे सर्मथन केले आहे. “एसटीची स्पर्धा जर लक्झरी बरोबर करायची असेल तर भाडेवाडीचा भार हा प्रवाशांना सहन करावा लागेल”, असं मत शिंदेंचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwar slams pratap sarnaik over st bus fare hike asc